संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यात शेतातील पिकांचे भरपूर नुकसान झालेलं आहे. यासंदर्भात झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीचा आर्थिक मोबदला मिळावा यासाठी माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली कामठी पंचायत समितीच्या तडफदार महिला सभापती दिशा चनकापुरे थेट तालुक्यातील शेतात ,बांध्यावर धडकल्या.यानुसार कामठी तालुक्यातील आजनी,गादा, आवंढी, भोंवरी,वरंभा या गावात पाहणी केली असता, भात पिकाचे व कपाशीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून आस्मानी सुलतानी संकटाने येथील शेतकरीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे. यावर संबंधित शेतकऱ्यांचे सांत्वन करीत निसर्गाची अवकृपा असल्याचे सांगत मनधरणी केली व संबधीत अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त शेतातील त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले व नुकसान भरपाईचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना मिळावा,अश्या सूचना दिल्या. याप्रसंगी उपसभापती दिलीप वंजारी ,कृषी विस्तार अधिकारी पंकज लोखंडे , कृषिसाहाय्यक सुनिल उज्जैनवार व गावातील सरपंच, ग्रामसेवक व शेतकरी उपस्थित होते.
सध्यास्तिथीत शेतकऱ्यांना आस्मानी सुलतानी संकटाला बळी पडावे लागल्याने जगावं कि मरावं हा मोठा प्रश्न भेडसावत आहे कारण तोंडाशी आलेला घास पळून गेला,अशी स्थिती शेतकऱ्यांसमोर आहे.
कामठी तालुका मध्ये शेतीमधील पिकांचे मोठे नुकसान झाले पांढरा दिसणारा कापूस लाल पडला, त्याची सरकी सडून वजन कमी झाले,धान काळा पडला,मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले.इकडे शासन शेतमालाला भाव देत नाही एकीकडे निसर्गाचा खेळ कधी पिकावर रोग, कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी पाऊस त्यात शासनानी शेतीसाबंधित खूप योजना सुरु केल्या मात्र निकष इतके आहेत कि बऱ्याच शेतकऱ्यांना त्याची माहिती नाही. यापूर्वी अतिवृष्टी चा पण शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही,म्हणून शासनाने नको त्या गोष्टीवर वायफळ खर्च टाळून शेतकऱ्यांना पिकाचा योग्य तो मोबदला द्यावा अशी मागणी सभापती दिशा चनकापुरे यांनी केली आहे.