– 27 माकडांना जंगलात सोडले
– माकडांच्या त्रासातून होणार सुटका
बेला :- माकडांच्या धुमाकूळ व उच्छादाला बेला येथील नागरिक अक्षरशः वैतागले आहे. अनेक महिला, पुरुषांवर झडप घालून चावा घेत त्यांना जखमी केले आहे. भरधाव बाईक समोरून अचानक आडवे जात असल्यामुळे कित्येक दुचाकीस्वार घसरून अपघातग्रस्त झाले आहे. लहान शालेय मुले,मुली तर माकडांच्या हैदोसाने भयभीत झाले आहे. जनतेला होणाऱ्या त्रासाची दखल घेत बेलाचे सरपंच अरुण बालपांडे यांनी वनविभागाची परवानगी व सांगली जिल्ह्यातील मिरज येथील हैदर खान बंदर पकडणेवाले यांच्या सहकार्याने 27 माकडाच्या एका टोळीला गुरुवारी अखेर पिंजऱ्यात जेरबंद केले. त्यामुळे इतर माकडे घाबरून सैरभैर झाली आहे
दिवसेंदिवस वाढणाऱ्या माकडांच्या त्रासामुळे बेला येथील सरपंच अरुण बालपांडे यांनी ग्रामपंचायतच्या मासिक सभेत माकडांचा बंदोबस्त करण्याचा ठराव पारित केला व तसे वनविभागाला कळविले. बुटीबोरी येथील उपवनसंरक्षक यांनी माकडे पकडण्याची परवानगी प्रदान केली.ग्रामपंचायतीने वानरे पकडण्यासाठी मंकी केज ( पिंजरे) उपलब्ध करून दिले. गुरुवार 13 जूनला पोलीस ठाण्यामागील जीर्ण मोडकळीस आलेल्या पडीत वसाहती समोर रेस्क्यू टीम द्वारे पिंजरा लावण्यात आला त्यामध्ये 27 माकडे शिरली व त्यांना जेरबंद करण्यात आले. यावेळी वनरक्षक कुलरकर व सहकारी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या निगराणीत माकडांना सुखरूप जंगलात नेऊन सोडण्यात आले. पकडण्यात आलेल्या माकडांना पिंजऱ्यात पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी गर्दी केली होती.
हैदरखान व सहकाऱ्यांची रेस्क्यू टीम
सांगली जिल्हा व मिरज तालुक्यातील मनेर येथील वानरे पकडणे वाले हैदरखान हे माकडांचा बंदोबस्त लावण्यात वाकबगार आहेत. अशी माहिती बेला येथील सरपंचांना मिळाली असता त्यांनी शोध घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांना करारबद्ध करण्यात आले. ते सध्या माकडे पकडण्यासाठी बेला येथे तळ ठोकून आहे.
प्रतिक्रिया :-
आसपासच्या शिवारातून सहा कळप गावात येऊन धुमाकूळ घालत आहे. त्यातील एका टोळीला पकडण्यात ग्रामपंचायतला यश आले आहे. वनविभागाच्या रेस्क्यू टीम द्वारे माकडे पकडण्यात येत असल्यामुळे माकडे घाबरली असून ते खवळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी माकडांपासून सावध सतर्क रहावे. लवकरच माकडांच्या इतर कळपांना सुद्धा पकडण्यात येईल.
अरुण बालपांडे, सरपंच,बेला.