नागपुर : वखार महामंडळाच्या नागपूर विभागातील हिंगणा-वाडी वखार केंद्रावर एकूण 26.465 मेट्रिक टन इतकी साठवणूक क्षमता आहे. हिंगणा-वाडी वखार केंद्र गोदामामध्ये शास्त्रोक्त पध्दतीने शेती व औदयोगिक मालाची साठवणूक केली जाते. या सोयीसुविद्या व सवलतीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वखार महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य महामंडळ शासनाचा सार्वजनिक उपक्रम असून राज्यभरात गोदामाचे जाळे निर्माण करून औद्योगिक व कृषी क्षेत्रास अन्नधान्याची नासाडी होऊ नये म्हणून साठवणूकीची सुविद्या पुरविण्यासाठी वखार महामंडळाची 8 ऑगस्ट 1975 पासून निर्मिती करण्यात आली. महामंडळाद्वारे शेतीमाल तसेच शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, किटकनाशके यांची शास्त्रोक्त पद्धतीने सुरक्षित साठवणूक करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाते. महामंडळाची मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापुर, नाशिक, अमरावती औरंगाबाद, लातुर ही 8 विभाग आहेत. राज्यातील ही एकूण 205 बजारकेंद्रावर 1260 गोदामांची एकूण साठवणूक क्षमता 25.17 लाख मेट्रिक टन आहे.
सवलती
ठेवीदारांना दिलेली महामंडळाची वखारपावती परक्राम्य लेख (Negotiable Instrument) असल्याने ती बँकेकडे तारण ठेवल्यास ठेवीदारांना बँकेकडून त्वरीत कर्ज उपलब्ध होते.त्याआधारे शेतकऱ्यांना हंगामात अर्थ सहाय्य व नंतर बाजारभाव येईपर्यंत गोदामात साठवणूकीची सोय मिळते. शेतकऱ्यांनी चालू पिकाचा सातबारा उतारा दिल्यांनतर वखार भाड्यात प्रचलित साठवणूक दराच्या 50 टक्के सवलत देवून 25 टक्के जागा आरक्षित करण्यात आलेली आहे. याशिवाय, प्रत्येक पंधरवड्यामध्ये किड प्रतिबंधात्मक व दर तीन महिन्यांनी उपचारात्मक किटकनाशकाच वापर करून माल सुरक्षित ठेवण्यात येतो. साठवणूकीस असलेल्या सर्वमालाचा 100टक्के विमा संरक्षण दिल्या जाते. त्यामुळे नुकसान झाल्यास योग्य ती भरपाई दिल्या जाते.
हिंगणा वाडी वखार केंद्र येथील ‘गोदाम लॉक ऑन की’ किंवा आरक्षणांतर्गतही देण्यात येतील. या शिवाय वखार महामंडळ व महाराष्ट्र सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यासाठी अभिनव ऑनलाईन तारण कर्ज योजना ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाचा वापर करून राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पात्र शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक कंपनींना वखारपावतीवरील शेतमालाच्या किंमतीच्या 70 टक्के कर्ज बँकेकडून संबधिताच्या खात्यात आरटीजीएस अथवा एनईएफटीव्दारे जमा करण्यात येते.
सुविधा
तारण कर्जाचा व्याजदर 9 टक्के असून तुलनेत सर्वात कमी आहे. महामंडळाच्या गोदामात साठवणुकीत ठेवण्यात येणाऱ्या शेतमालाच्या वखारपावतीवर ऑनलाईन तात्काळ कर्ज उपलब्ध होत असल्याने संबंधित शेतकरी ठेवीदारांची वेळेची बचत होऊन कागदपत्रांसाठीच्या प्रवास खर्चात बचत होण्यास मदत होते. शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या सुविधांचा लाभ सुगीच्या काळात व्यापाऱ्यांना माल न विकता वखार महामंडळाच्या गोदामात ठेवावा, असे आवाहन साठा अधीक्षक, वखार महामंडळ यांनी केले आहे.
@फाईल फोटो