नागपूर :- आपला देश हा आता अमृत काळातून जात आहे. २०२३ ते २०४७ यादरम्यानचा २०३५ पर्यंतचा काळ हा देशाची दिशा ठरविणारा असेल. २०३५ पर्यंत देशातील तरुणांची संख्या सर्वाधिक असेल. त्यामुळे अमृत काळात देशाच्या विकासात युवकांची भूमिका मोलाची राहणार असल्याचे प्रतिपादन नागपुरचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे मनी बी इन्स्टिट्यूटमार्फत अमृत काळ आणि गुंतवणुकीवर आधारित चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमाला पहिल्या समारोपीय सत्रात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संबोधित केले. तर दुस-या सत्रात फडणवीस बोलत होते.
मनी बी इन्स्टिट्यूटच्या संयोजक शिवानी दाणी – वखरे, आशुतोष वखरे, स्टॉक मार्केट तज्ञ एस. पी. तुलसीयन, विजय केडिया, अभिमन्यू तुलसियन उपस्थित होते. अमृत काळातील भारत कसा असेल तसेच गुंतवणुकीचे विविध मार्ग या विषयावर आधारित एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चसत्राचा समारोप आज झाला.
उपमुख्यमंत्री समारोपप्रसंगी म्हणाले की, जगातील वेगाने विकसित होणारी भारताची अर्थव्यवस्था आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढील पाच वर्षात भारताला पहिल्या तीन अर्थव्यवस्थेत आणण्याचे स्वप्न पाहिले आहे. अमृतकाळात हा संकल्प महत्वपूर्ण आहे. या अमृत काळात सन २०३५ पर्यंतचा टप्पा तरुणाईचा आहे. त्यामुळे या काळात स्वप्नपूर्तीसाठी देशाचा युवा वर्ग महत्वाची भूमिका बजावणार आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येत युवकांचे प्रमाण हे ६५ टक्के आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या विकासात युवकांचा मोलाचा वाटा राहणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
विकसित देशाकडे भारताची वाटचाल सुरू आहे. ११ व्या क्रमांकावरून देशाची अर्थव्यवस्था ५ व्या क्रमांकावर आली आहे. लवकरच ती तिस-या क्रमांकावर आणण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न पूर्णत्वास आणण्यासाठी नवीन तंत्रज्ञान तसेच कालानुरूप अर्थसाक्षर होण्याची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.
चीनचा अर्थक्षेत्रातील प्रगतीचा उल्लेख करीत उपमुख्यमंत्री म्हणाले की, चीनने गेल्या ३० वर्षात आर्थिक क्षेत्रात प्रगती साधली आहे. जगाच्या उत्पादन क्षेत्रात चीनचा ३० टक्के वाटा आहे. पुरवठा साखळी ही जगाच्या तुलनेत सक्षम असल्याचे दिसून आले आहे. यामागील कारण हे चीनच्या युवा पीढीचा देश विकासात मोलाचा वाटा हा असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.