– मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र
नागपूर :- दीक्षाभूमी परिसरात पार्किंगसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. खड्ड्यातील पाणी उपसून जागा समतल करावी, अशा आशयाचे पत्र परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष व धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठविले आहे. यासोबतच एनआयटी, मनपा आणि एनएमआरडीला लेखी निवेदन पाठविले आहे.
भदंत ससाई यांनी गुरुवार, 25 जुलै रोजी सकाळी दीक्षाभूमी परिसराची पाहणी केली. तासभर केलेल्या पाहणीदरम्यान पार्किंगसाठी केलेला खड्डा आणि परिसरात साचलेल्या पाण्यावरून त्यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी ससाई यांनी स्तुपाचीही पाहणी करून कुठे पाणी झिरपते आहे काय, याची शहानिशा करून घेतली.
दीक्षाभूमी परिसरात अंडरग्राऊंड पार्किंगसाठी मोठा खड्डा तयार करून बांधकामाला सुरुवात झाली होती. नंतर येथील बांधकाम थांबविण्यात आले. शनिवार, 20 जुलै रोजी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. पावसाच्या पाण्याने दीक्षाभूमी परिसरातील खड्डाही भरला. अधिक काळ पाणी साचून राहिल्यास आतमधून पाणी झिरपू शकते तसेच दीक्षाभूमीत येणार्या अनुयानांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या खड्ड्यात साचलेले पाणी बाहेर काढून जागा समतल करावी, अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मनपा आयुक्त, एनआयटी, नागपूर महानगर प्रदेश आयुक्त यांना देण्यात आले आहे. पाहणीदरम्यान दीक्षाभूमीचे सुरक्षा अधिकारी सिद्धार्थ म्हैसकर उपस्थित होते.