कांग्रेसमध्ये कामठी-मौदा विधानसभेच्या उमेदवारी तिकीट करिता जोरदार स्पर्धा..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

-कामठी-मौदा विधानसभे करिता आठ इच्छुकांचे उमेदवारी मागण्याकरिताअर्ज

कामठी ता प्र 28:-आगामी दिवसात होऊ घातलेल्या कामठी मौदा विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून कांग्रेस पक्षाची उमेदवारी तिकीट मिळावी यासाठी पक्ष पदाधिकारी नाना गावंडे यांच्याकडे आठ इच्छुकांनी उमेदवारी मागण्यासाठी अर्ज सादर केले आहेत त्यामध्ये सुरेशभाऊ भोयर, अवंतिका लेकुरवाडे,प्रसन्ना तिडके, नाना कंभाले,जयंत दळवी,हुकूमचंद आमधरे,मुजीब पठाण,शकुर नागांनी यांच्या नावाचा समावेश आहे.यातील सुरेश भोयर व अवंतिका लेकुरवाडे या दोन नावात मोठी स्पर्धा असल्याचे बोलले जात असले तरी मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले सुरेश भोयर यांनी पराभवाची धास्ती मनात न ठेवता सुनील बाबू केदार यांच्या खांद्याला खांदा लावत उणिवा असलेल्या अडचणी दूर करून सतत पाच वर्षे मतदारांच्या संपर्कात राहून मतदारसंघ काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे.तर दुसरीकडे अवंतिका लेकुरवाडे यांना जणू काही पक्षाची हिरवी झेंडी मिळाली की काय तर आपली तिकीट कन्फर्म असल्याचा दावा ठोकत पूर्ण मतदार संघ आतापासूनच सर्वतोपरी पिंजून काढत आहेत तर प्रसन्ना तिडके यांना ही तिकीट मिळण्याची पूर्ण हमी असून कांग्रेस साठी काही प्रमाणात कमजोर असलेल्या नागपूर ग्रामीण कडे लक्ष वेधून बसले आहेत तेव्हा या आठ इच्छुकांपैकी कुणाच्या नावाची वर्णी लागणार हे वेळ ठरवणार असली तरी नागरिकांत आतापासूनच उत्सुकता दिसून येत आहे तसेच 1995 पासून या मतदार संघात कांग्रेस चे पाणीपत कायम आहे तेव्हा आता तरी हे पानिपत संपून कांग्रेसचा उमेदवार उगवणार का?हे अनुत्तरित आहे.

कामठी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दिवंगत यादवराव भोयर यांनी सन 1985 ते 1995 च्या दोन पंचवार्षिक कामठी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र त्यानंतर म्हणजे 1995 पासून हा मतदार संघ कांग्रेस च्या प्रतिनिधित्व पासून दूर राहिलेला आहे.तर एकदा पराभूत झालेल्या कांग्रेस च्या उमेदवाराला दुसऱ्यांदा उमेदवारी तिकीट मिळालेली नाही हे इथं विशेष!

सन 1962 मध्ये कामठी विधानसभा मतदार संघाची स्थापना झाली असून मागील सहा दशकांचा विचार केल्यास सन 1962 मध्ये कामठी विधानसभा निवडणुकीत कांग्रेस चे आनंतराम चौधरी यांनी 20 हजार 36 मते घेऊन विजय मिळवीत प्रतिस्पर्धी असलेले रिपब्लिकन पक्षाचे कालचंद्र सोनटक्के यांचा 5 हजार 50 मतांनी पराभव करून कांग्रेस पक्षाचा खाता उघडला होता.सन 1967 मध्ये कांग्रेस पक्षाकडून सुलेमान खान पठाण यांनी 22 हजार 154 मते घेऊन रिपब्लिकन पक्षाचे कामगार नेते ऍड नारायण हरी कुंभारे यांचा 7 हजार 182 मतांनी पराभव करून विजय मिळविला होता.सन 1972 मध्ये कांग्रेस चे सुलेमान खान पठाण यांनी रिपब्लिकन पार्टी(खोब्रागडे गट)रामदास विठोबा मेश्राम यांचा 15 हजार 594 मतांनी पराभव करून विजय मिळविला होता.1978 मध्ये कांग्रेस चे तेजरावसिंह भोसले यांनी रिपब्लिकन पार्टी (खोब्रागडे गट)डॉ रजनी रॉय यांचा 25 हजार 491 मतांनी पराभव करून विजय मिळविला होता.सन 1980 मध्ये कांग्रेस चे सुरेशबाबू देवतळे यांनी युनायटेड कांग्रेस चे डॉ मोहम्मद कुरेशी यांचा 19 हजार 227 मतांनी पराभव करून विजय मिळविला होता.सन 1985 मध्ये कांग्रेस चे यादवराव भोयर यांनी रिपब्लिकन पार्टी चे ऍड संपत रामटेके यांचा 32 हजार 74 मतांनी पराभव करून विजय मिळविला होता.सण 1990 मध्ये पुनश्च यादवराव भोयर यांनी कांग्रेस पक्षातून उमेदवारी घेत देवराव रडके यांचा 599 मतानी निसटता पराभव करीत विजय मिळविला होता.सन 1995 मध्ये यादवराव भोयर यांनी पुनश्च कांग्रेस ची उमेदवारी घेत हेट्रिक करण्याचा निश्चय केला होता मात्र कांग्रेस च्या अंतर्गत गटबाजी नेत्यांनी यादवराव भोयर यांचा विरोध करीत देवराव रडके यांना रिंगणात अपक्ष उतरवून छुप्या पद्धतीने मदत करून ‘घंटा ‘या निवडणूक चिन्हावर उभे असलेले देवराव रडके यांनी 59 हजार 738 मते घेऊन कांग्रेस चे उमेदवार यादवराव भोयर यांचा 22 हजार 801 मतांनी दारुण पराभव केला .1999 मध्ये रिपब्लिकन पक्ष व कांग्रेस पक्षाची आघाडी होऊन ऍड सुलेखाताई कुंभारे यांना उमेदवारी मिळाली होती यावेळी ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी भाजप सेना युतीचे उमेदवार मनोहर आखरे यांचा अवघ्या 5226 मतांनी पराभव करीत विजय मिळविला होता.2004 मध्ये रिपब्लिकन कांग्रेस आघाडी कडून माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांना पुनश्च निवडणूक रिंगणात उतरविले यावेळी त्यांच्या विरोधात भाजप सेना युतीचे चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी मिळाली होतो दरम्यान कांग्रेस च्या काही गटबाजी कार्यकर्त्यांनी नागपूर जिल्हा परिषद चे माजी सभापती पुरुषोत्तम शहाणे यांना बंडखोरी करीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरविले दरम्यान पुरुषोत्तम शहाणे यांना 26 हजार मते मिळाली तर विजयश्री झालेले भाजप सेना युतीचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिस्पर्धी असलेल्या ऍड सुलेखाताई कुंभारे यांचा 7 हजार 394 मतांनी पराभव करून विजय मिळविला.

2009 मध्ये भाजप सेना युतीकडून माजी आमदार चांद्रशेखर बावनकुळे पूनश्च निवडणूक रिंगणात उतरून प्रतिस्पर्धी असलेल्या कांग्रेस च्या उमेदवार सुनीता गावंडे यांचा 31 हजार 93 मतांनी दारुण पराभव केला.यावेळी बावनकुळे यांना 95 हजार 80 मते मिळाली होती सन 2014 मध्ये भाजप सेना युतीचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजयाची हेट्रिक करीत प्रतिस्पर्धी असलेले कांग्रेस चे उमेदवार राजेंद्र मुळक यांचा 40 हजार 2 मतांनी पराभव केला .2019 मध्ये भाजप चे उमेदवार टेकचंद सावरकर यांनी कांग्रेस चे उमेदवार सुरेश भाऊ भोयर यांचा 11 हजार 116 मतांनी पराभव केला होता.

या सर्व बाबींचा विचार केला असता निवडणुकीच्या वेळी पक्षश्रेष्ठीकडून देण्यात येणारी उमेदवारी तिकीट ही पक्षातील काही पदाधिकारी कार्यकर्त्यांना पटण्यासारखे नसल्याने गटबाजी पदाधिकारी कार्यकर्ते हे अप्रत्यक्ष रित्या बंड पुकारीत गटबाजी कायम ठेवून घरातच राहून घरातील सदस्यांचा घात करीत असल्याने घर का भेदी लंका ढाये ही स्थिती कायम आहे परिणामी 1995 पासून कामठी विधानसभा मतदार संघात कांग्रेसला आमदारकीचे प्रतिनिधित्व मिळाले नसल्याने आता तरी गटबाजी दूर सारून एकनिष्ठ कायम राखीत कांग्रेस चा पंजा उगवेल का?याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जनआक्रोश संघटनेच्या पाठीशी नेहमी उभा राहणार - ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिली ग्वाही

Thu Aug 29 , 2024
– ना.मुनगंटीवार यांचा ‘विकासरत्न’ पुरस्काराने गौरव चंद्रपूर :- जनआक्रोश संघटना समाजिक कार्यात अग्रणी आहे. संघटनेच्या माध्यमातून समाजासाठी अनेक महत्त्वाची कामे केली जातात. या कार्यात कुठलीही अडचण येऊ नये याकरिता जनआक्रोश संघटनेच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे पूर्ण ताकदीने उभा राहणार, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. जनआक्रोश संघटना महाराष्ट्र राज्य द्वारा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com