![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
मुंबई :- महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सर्वंकष प्रयत्नांसह शाश्वत विकास उद्दिष्टांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
सेंट पीटर्सबर्ग येथे आयोजित सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स फोरमच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी नाफी रिसर्च सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गुझेलिया इमाऐव्हा, रशियन फेडरेशन नॉर्दन अफेअर्स उपाध्यक्ष गॅलीनो कैरेलोव्हा, नवाह एनजी कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापक हिंद अल नक्बी, व्ही. के. कंपनीच्या उपाध्यक्ष ऐलोना इसागुलोव्हा,सीबूरच्या व्यवस्थापकीय संचालक मरीना मेडव्हेडेव्हा, अणु उद्योग महिला संघटना संस्थापक अॅलेक्झाड्रोया बिक, व्हेल फार्मच्या अध्यक्ष ल्यूड मिला शेरबाकोव्हा,केंद्रीय आरोग्य व जैविक यंत्रणा रशिया तात्याना याकोलेव्हा आणि गेम्स ऑफ द फ्यूचर्सच्या उपसंचालक ॲना खारमास यांनी “बहू केंद्रीय जागतिक अर्थ व्यवस्थेकडे संक्रमण अंतर्गत विकास धोरणाचा स्त्रियांचा आर्थिक सक्षमीकरणावरील परिणाम” या विषयावरील जागतिक परिसंवादात सहभाग नोंदविला.
डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की, स्त्रियांच्या आर्थिक उन्नतीसाठी व दारिद्रयनिर्मूलनासाठी जागतिकीकरणाचा प्रभाव मोठा आहे. महिलांना संधी उपलब्धता मिळण्यासाठी व त्यांचे ध्येय पूर्तता होण्यासाठो वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरम व कमिशन फॉर स्टेटस ऑफ वुमन यांची भूमिका महत्वाची आहे.
कमिशन फॉर स्टेटस ऑफ वुमनने तयार करुन दिलेल्या कृती आराखडयावर जगभरातील सर्व राष्ट्रांना आपले उत्तर सादर करावे लागते. त्यामुळे यास अत्यंत महत्व आहे. स्त्रियांच्या राजकारणातील वाढत्या सहभागामुळे त्यांचे सक्षमीकरण होण्यास अधिक मदत मिळते.
शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महिलांचा वाढता सहभाग असणे महत्वाचे आहे, लिंग समभाव व आर्थिक सक्षमीकरण यास प्रोत्साहन देणे, मानवी तस्करी, लैंगिक छळ यास प्रतिबंध करणे व बाल हक्कांचे रक्षण करणे आवश्यक आहे. या बाबतीत रशियामध्ये चांगले प्रयत्न झालेले आहेत. तसेच महाराष्ट्र विधानपरिषद, विधानसभा आणि सेंट पीटर्सबर्ग येथील विधिमंडळ यांच्यात झालेला सामंजस्य करार या दृष्टीने महत्वाचा आहे.
भारतात स्टार्ट अप उद्योगाचे प्रमाण वाढत आहे. तसेच हस्त कला व कृषी क्षेत्रातही प्रगती होत आहे. याबरोबरच नैसर्गिक आपत्तीमुळे होत असलेले नुकसान सर्वात जास्त स्त्रियांना सहन करावे लागते, ही वस्तूस्थिती बदलण्याची आवश्यकता आहे, असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.