– ‘मध्य भारतात उद्यमशीलतेच्या संधी’ यावर चर्चासत्र
नागपूर :- व्यवसाय करण्यासाठी भविष्याचा वेध घेणारे तंत्रज्ञान, कच्च्या मालाची उपलब्धता, बाजारपेठ आणि व्यावहारिकता या चार गोष्टींचा अभ्यास करणे गरजेचे असते. आपले उत्पादन चांगले असेल, त्याचे ब्रांडिंग आणि पॅकेजिंग उत्तम असेल तर ग्राहकांचा प्रतिसाद मिळतोच. पण त्यासाठी गुणवत्तेच्या आधारावर उद्यमशीलता विकसित करा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार) केले.
एमएसएमई कार्यालयाच्या सहकार्याने मेहमुदा शिक्षण आणि महिला ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नीरीच्या सभागृहात ‘मध्य भारतात उद्यमशीलतेच्या संधी’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यावेळी एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, माजी मंत्री डॉ. अनीस अहमद, एमएसएमईचे संचालक पी.एम. पार्लेवार, सीएसआयआर-नीरीचे संचालक डॉ. अतुल वैद्य, डॉ. प्रमोद खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ना. गडकरी म्हणाले, ‘व्यवसायात वक्तशीरपणा आणि विश्वासार्हतेसोबतच गुणवत्तेला खूप महत्त्व आहे. लोकांना आवडेल असे उत्पादन तयार करणे आणि त्याची गुणवत्ता कायम राखणे या दोन बाबींची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी ज्ञान हे सर्वोत्तम माध्यम आहे. या सर्वांची सांगड घातली तर महिलांना यशस्वी उद्योजक होणे नक्कीच शक्य आहे.’
यावेळी एमएसएमईच्या योजनेच्या संदर्भातही ना. श्री. गडकरी यांनी मार्गदर्शन केले. ‘एमएसएमईने महिला उद्योजकांना आपल्या पायावर उभे राहता यावे, यासाठी अनेक योजना आणल्या. पूर्वी महिलांना कर्ज घेताना बँक गॅरंटी द्यावी लागायची. पण आता या कर्जाची गॅरंटी सरकारने घेतली आहे. त्यामुळे महिलांनी अधिकाधिक प्रयत्न करून नाविन्यपूर्ण उद्योगासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी आपल्याला ज्या क्षेत्रात उद्योग करायचा आहे, त्या क्षेत्राचा अभ्यास करून दिशा ठरवावी,’ असेही ना. गडकरी म्हणाले.