– देऊळगाव वळसा व डोलारी येथे सभा
यवतमाळ :- विदर्भात एकमेव असलेल्या महालक्ष्मीच्या आशीर्वादाने दारव्हा तालुक्यात लोकसभा निवडणुकीचा सुरू केलेला प्रचार येथील विकासासाठी मला संसदेपर्यंत नक्कीच घेवून जाईल, असा विश्वास महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील-महल्ले यांनी व्यक्त केला. आज दारव्हा तालुक्यातील देऊळगाव वळसा येथील महालक्ष्मी व व्याघ्रांगी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्या बोलत होत्या.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या निमित्ताने आज देऊळगाव वळसा गावात आई महालक्ष्मीचे आशीर्वाद घेण्यासाठी राजश्री पाटील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह गेल्या होत्या. यावेळी गावातील महिलांनी पारंपारिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. श्री व्याघ्रांगी व महालक्ष्मी मंदिर संस्थानने राजश्री पाटील यांचा सत्कार करून आशीर्वाद दिले.
जागृत देवस्थान श्री व्याघ्रांगी व महालक्ष्मी मंदिरात राजश्री पाटील यांनी मनोभावे दर्शन घेवून पूजा केली व यवतमाळच्या विकासाकरीता विजयरूपी आशीर्वाद मागितले. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नाने देऊळगाव वळसा येथे तीर्थक्षेत्र विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. भविष्यात मुंबईचे महालक्ष्मी मंदिर आणि कोल्हापूरच्या अंबाबाई महालक्ष्मी मंदिराच्या धर्तीवर देऊळगाव वळसा येथील महालक्ष्मी व व्याघ्रांगी मंदिराच्या विकासाचा संकल्प यावेळी राजश्री पाटील यांनी बोलून दाखविला.
यासोबतच त्यांनी आज दारव्हा तालुक्यातील डोलारी देवी गावात झालेल्या विजयी संकपल्प सभेत नागरिकांना संबोधित केले. आज बंजारा दिवस असल्याने उपस्थित बांधवांना बंजारा दिनाच्या शुभेच्छा देत त्यांना या परिसराच्या सर्वांगीण विकासाला आणि येथील शेतकरी, महिला व बेरोजगारांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची ग्वाही दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस वसंत घुईखेडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीधरकाका मोहोड, भाजपा जिल्हाध्यक्ष महादेवराव सुपारे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. दुबे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदा पवार, भाजपा तालुकाध्यक्ष घनश्याम वानखेडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष चरण पवार, शिवसेना यवतमाळ तालुकाप्रमुख मनोज सिंगी तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, गावातील नागरिक, महिला व तरूणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.