नागपूर :- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी केंद्रीय कमिटी सदस्य तसेच आदिवासींमधील कामांना सतत वाहून घेतलेले प्रसिद्ध विचारवंत कॉम्रेड कुमार शिराळकर यांचा श्रद्धांजली कार्यक्रम 15 ऑक्टोबरला हिंदी मोर भवन येथे घेण्यात आला.
याप्रसंगी बोलताना प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले की कुमार शिराळकरांचा काळ हा स्वातंत्र्योत्तर काळात नवभारत बनवण्यासाठी होणाऱ्या आंदोलनांचा काळ होता. प्रामुख्याने दलित आदिवासी इतर मागासवर्गीय तसेच आर्थिक दृष्ट्या पीडित जनतेचे प्रश्न उचलून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बरेच कार्यकर्ते प्रयत्नशील होते, आय आय टी मध्ये टॉपर राहूनही हेच कार्य आपले समजून कुमार शिराळकरांनी आदिवासींमध्ये काम करण्याचा वसा घेतला. त्यासाठी त्यांनी स्वतः मध्ये बदल करून स्वतःला डी कास्ट व डी क्लास बनवले. आज पुन्हा एकदा पीडितांचा आवाज तसाच लावणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.
याच कार्यक्रमात बोलताना डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले यांनी जागतिकीकरणानंतर समाजाचे बदललेले स्वरूप विशद करून आज आर्थिक सामाजिक व प्रादेशिक न्याय मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
1969 ला शिराळकरांशी पहिली भेट झालेले जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे नेते अशोक फुल म्हणाले की कुमार शिराळकर यांनी आदिवासींमधून नेतृत्व घडवलं, नामांतर आंदोलनामध्ये दोघेही सोबत असल्याचे त्यांनी जाणीवपूर्वक विषद केले.
कॉम्रेड बी. टी. रणदिवे अध्ययन केंद्राच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष मदन भगत यांनी कॉम्रेड कुमार शिराळकर यांनी आदिवासी वनाधिकार कायद्याचे नियम बनवताना देशातील सर्व आदिवासींशी संवाद साधताना देशव्यापी दौरा केला व त्याद्वारे सर्व आदिवासींना सुसंगत असे नियम तयार केले याचा गोषवारा मांडला.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अरुण लाटकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अरुण वनकर तसेच सीटूचे जिल्हा सेक्रेटरी दिलीप देशपांडे यांनीही आपली श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाचे संचालन विलास जांभुळकर यांनी केले.