नागपूर :- देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या मनात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण व्हावी आणि कचरामुक्त शहर या संकल्पनेला व्यापक रूप देत याकरिता नागरिकांनी पुढाकार घ्यावा म्हणून केंद्र शासनाने “इंडियन स्वच्छता लीग २.० या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेसाठी नागपूर महानगरपालिकेचा संघ सज्ज झाला आहे.
‘टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ म्हणून नावलौकिक असणाऱ्या नागपूर शहराच्या संघाला “नागपूर टायगर्स” असे नाव देण्यात आले आहे. “नागपूर टायगर्स” या संघाच्या कर्णधारपदी सुरभी जयस्वाल यांची निवड करण्यात आली असून, शहराचे स्वच्छ भारत मिशन नागपूरचे ब्रँड अॅम्बेसेडर कौस्तभ चॅटर्जी, तेजस्विनी महिला मंचच्या किरण मुंदडा, भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे माजी कर्णधार गुरदास राउत, उमेश चित्रीव यामध्ये असणार आहेत.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा या अभियानाचे आयोजन केले आहे. या अभियानांतर्गत देशभरातील सर्व शहरांमध्ये १७ सप्टेंबर रोजी इंडियन स्वच्छता लीग ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्वच्छता मोहिमेत नागरिक, सेवाभावी संस्था, तरुण, विद्यार्थी आदींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकाद्वारे करण्यात आले आहे.