नागपूर :- महाराष्ट्र राज्यात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी असताना सुद्धा नागपुरात सर्रास कॅरी बॅगची निर्मिती करणा-या वर्धमान नगर येथील रिद्धी सिद्धी प्लास्टिक कंपनीवर नागपूर महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभागाने शुक्रवारी (ता.२२) छापा टाकून कारवाई केली. नागपूर महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे संयुक्तरित्या करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये २२०९ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या प्लास्टिकची अंदाजे किंमत १ लाख ५४ हजार ६३० रुपये एवढी आहे.
वर्धमान नगर परिसरात रिद्धी सिद्धी कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिकची निर्मिती सुरू असल्याची माहिती नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला प्राप्त झाली. यासंदर्भात मनपा आयुक्त तथा डॉ. अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार घनकचरा व्यस्थापन विभागाचे संचालक आणि उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले मार्गदर्शनामध्ये उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात पथकाद्वारे छापा टाकण्याचे निश्चित करण्यात आले. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहिती देउन संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कंपनीचे मालक शैलेश भाई शेजपाल यांचेवर पर्यावरण संरक्षण कायदा आणि प्लास्टिक बंदी कायद्या अंतर्गत प्रथम कारवाई ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला व २२०९ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे आणि त्यांची चमू कारवाईप्रसंगी उपस्थित होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे श्री. अमोल देशमुख तसेच ग्रीन फाउंडेशनचे श्रीकांत शिवणकर, मेहबूब पठाण उपस्थित होते. उपद्रव शोध पथकाचे लकडगंज झोन प्रमुख नथ्थु खांडेकर, सतरंजीपुरा झोन प्रमुख प्रेमदास तरवटकर, बबन बोबडे, दिनेश गाडगे, राजेश भिवगडे, बंडू येलमुले, प्रशांत राउत, राजेश पाठक, प्रफुल्ल वर्मा यांनी ही कारवाई पूर्ण केली.
उपद्रव शोध पथकाद्वारे शुक्रवारी (ता.२२) दिवसभरात प्रतिबंधात्मक प्लास्टिक विरोधात एकूण चार ठिकाणी कारवाई करून २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.