![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
– असोसिएशन ऑफ क्यूटेनीयस सर्जन्स इंडियाच्या कॉन्फरन्सचे उद्घाटन
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
नागपूर :- वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयाचे संचालन करण्यासाठी आर्थिक बाब अत्यंत महत्त्वाची असतेच, पण तरीही गरिबांना स्वस्त दरात आरोग्यसेवा कशी देता येईल, याचाही विचार करणे आवश्यक आहे. सामाजिक बांधिलकीतून वैद्यकीय सेवा पुरविणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (गुरुवार) केले.
हॉटेल ली मेरिडीयन येथे आयोजित असोसिएशन ऑफ क्यूटेनीयस सर्जन्स इंडियाच्या कॉन्फरन्सचे उद्घाटन ना. गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. एम. हनुमंथा राव यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ना. गडकरी म्हणाले, ‘आज भारतात आरोग्य सेवेच्या क्षेत्रातील मागणी लक्षात घेता डॉक्टरांची संख्या वाढण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालये वाढण्याची गरज आहे.
भारतातील विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी बाहेरच्या देशांमध्ये जाऊ नये, यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे. या क्षेत्रात सार्वजनिक-खासगी गुंतवणुक वाढली पाहिजे म्हणून आरोग्य मंत्र्यांशी चर्चा सुरू आहे. त्यासोबतच एम्ससारख्या संस्थांची संख्या वाढली तर सर्वसामान्य जनतेला दिलासाच मिळणार आहे.’ दर्जा राखणे आणि लोकाभिमुख सेवा देणे असा समतोलही राखायचा आहे, असेही ना. गडकरी म्हणाले. यावेळी त्यांनी अमेरिका आणि इंग्लंडमधील उदाहरण देखील दिले. ‘अमेरिका आणि इंग्लंडमध्ये दहा प्रतिष्ठित डॉक्टरांपैकी सहा डॉक्टर्स भारतीय आहेत. भारतीय डॉक्टरांना जगभरात प्रतिष्ठा आहे. आपल्या देशातही दर्जेदार सेवा देणारे आपल्यासारखे डॉक्टर्स आहेत, ही भारताची शक्ती आहे,’ असेही ते म्हणाले.