नवी दिल्ली :-भारताच्या जैव अर्थव्यवस्थेने गेल्या दहा वर्षात, 12 पट अधिक वाढ नोंदवल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट जीनोम रिसर्च (एनआयपीजीआर) इथे ‘नॅशनल प्लांट कॉम्प्युटेशनल बायोलॉजी अँड बायोइन्फॉर्मेटिक्स फॅसिलिटी’ संस्थेच्या रौप्य महोत्सवी समारंभाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भारताची जैव अर्थव्यवस्था आधी सुमारे 10 अब्ज डॉलर्स होती, आज ती 120 अब्ज डॉलर्स आहे. केवळ दहा वर्षांत, त्यात 12 पटीने वाढ झाली आहे आणि 2030 पर्यंत ती 300 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असं ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, धोरणात्मक नियोजन केल्याने, जैव अर्थव्यवस्थेला पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे, असं ते पुढे म्हणाले.
यावेळी, डॉ जितेंद्र सिंह यांनी ‘अद्विका’ हे नवे अधिक उत्तम, दुष्काळात त्याग धरू शकणारे, वातावरणाशी जुळवून घेऊ शकणारे चण्याचे वाण जारी करत असल्याची घोषणा केली. या संबंधीचे राजपत्र देखील जारी करण्यात आले आहे आणि हे वाण सर्वत्र उत्पादनासाठी तयार आहे. भारतात जगातल्या एकूण चणा उत्पादनच्या 74% उत्पादन होते आणि परदेशी चलन मिळविण्याचा हा एक उत्तम स्रोत बनू शकतो हे सांगताना विशेष आनंद होत आहे, असे डॉ सिंह म्हणाले.
या क्षेत्रात येत असलेली तेजी बघता, 2025 पर्यंत जगातील आघाडीच्या 5 जैव उत्पादक केंद्रांपैकी एक होण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरु आहे आहे, असं डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितलं.
जैवतंत्रज्ञान असे वातावरण तयार करते, जे स्वच्छ, हरित आणि निरामयतेच्या दृष्टीने अधिक सुसंगत असेल. जस जसा काळ पुढे जाईल, त्यातून उपजीविकेचे आकर्षक स्रोत देखील निर्माण होत जातील, तसेच अन्न पदार्थ, जैवअभियांत्रिकी सहकार्य, पशुखाद्य या पेट्रोकेमिकल आधारीत उत्पादनाला पर्याय देखील उपलब्ध होईल.