![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
– उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोनांतर्गत समाजविकास विभाग सज्ज
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
नागपूर :- नागपूर शहरातील वाढते तापमान लक्षात घेता बेघर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या समाजविकास विभागाद्वारे बेघरांचा शोध घेउन त्यांना निवारा केंद्रात आश्रय दिला जात आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शानानुसार, समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या नेतृत्वात हे अभियान राबविण्यात येत आहे.
समाज विकास विभागाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत उष्माघातामुळे बेघर व्यक्तींच्या जीवाला उष्माघातामुळे धोका निर्माण होउ नये यासाठी नागपूर शहरातील सार्वजनिक ठिकाणी बेघर व्यक्तीची शोध मोहीम राबवून त्यांना निवाऱ्यात आणण्यात येत आहे. तसेच बेघरांसाठी नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून त्यात नि:शुल्क औषधोपचाराची सोय बेघरासाठी करण्यात येत आहे.
शहरात उष्माघातामुळे जीवितहानी होऊ नये यासाठी शहरातील रस्ते, बाजार, बसस्थानक, दवाखान्यांमध्ये तसेच शहरातील प्रमुख ठिकाणी उष्माघात प्रतिबंधासंदर्भात प्रत्येक विभागामध्ये योग्य कार्यवाही करण्यात यावी तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत उष्माघात प्रतिबंधक कृती योजनेची तातडीने अंमलबजावणी व्हावी यासाठी उपाययोजनात्मक कार्यवाही करण्यात येत आहे. नागपूर शहरात उघड्यावर वास्तव्य करणारे बेघर हे शहराचाच एक भाग आहेत, परिस्थितीने असे जीवन त्यांच्या नशिबी आले असले तरी आनंदी जीवन जगण्याचा अधिकार त्यांनाही आहे, म्हणून त्यांचे जीवन सुसह्य करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाने दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरात ४०० व्यक्तींच्या निवासाची क्षमता असलेले सहा बेघर निवारा केंद्र सुरू केलेले आहे. त्यामुळे उघड्यावर झोपणाऱ्या बेघर व निराधारांना बेघर निवारा केंद्राचा मोठा आधार मिळाला आहे. त्यांना निवारागृहात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
बेघरांच्या मदतीसाठी संपर्क साधा
बेघर नागरिकांचा उष्माघातापासून बचाव करून बेघर निवारा केंद्रामध्ये पाठविण्यासाठी नागरिकांनी ८०८०१४३८७३, ९९६०१८३१४३, ९९६०३२७५३२ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी केले आहे.
शहरातील बेघर निवारा केंद्र व क्षमता
१. आश्रय शहरी बेघर निवारा, जुने सतरंजीपुरा झोन इमारत, मारवाडी चौक, इतवारी, नागपूर (क्षमता -३०)
२. बोधिसत्व शहरी बेघर निवारा, इंदोरा मठमोहल्ला येथील वाचनालय व समाजभवन, नारारोड, इंदोरा, नागपूर (क्षमता -२०)
३. आधार शहरी बेघर निवारा, बुटी कन्या शाळा, बुटी दवाखान्याजवळ, सुपर मार्केटमागे, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर (क्षमता -५०)
४. सावली शहरी बेघर निवारा, हंसापुरी प्राथमिक व माध्यमिक शाळा, टिमकी भानखेडा, नागपूर (क्षमता -१००)
५. आपुलकी शहरी बेघर निवारा, नवीन इमारत, इंदोरा मठमोहल्ला येथील वाचनालय व समाजभवन, नारारोड, इंदोरा, नागपूर (क्षमता -५०)
६. आस्था भिक्षेकरी निवारागृह, ब्लॉक क्र. ६५२-बी, ताजश्री होंडा शोरूमच्या बाजूला, घाट रोड, कॉटन मार्केट, नागपूर (क्षमता -१५०)
एकूण क्षमता ४००