नागपूर : रेशीम उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच राज्य सरकारकडून राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यत पोहचवा. या उद्योगात नागपूर जिल्ह्याने अग्रेसर व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
गावपातळीवरील शेतक-यांपर्यंत पोहोचविण्याकरिता जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या रेशीम रथाचे दिनांक 23 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महारेशीम अभियानाचा शुभारंभही करण्यात आला. त्यावेळी त्यांनी जिल्हयातील शेतकऱ्यांनी या उद्योगात पुढे येण्यासाठी रेशीम विभागाची मदत घेण्याचे आवाहन केले. यासाठी विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले.रेशीम उद्योग हा आर्थिक लाभ मिळून देणारा उद्योग आहे. पारंपारिक पिकाला एक उत्कृष्ट जोडधंदा ठरू शकतो. महारेशीम अभियानातंर्गत जास्तीत जास्त शेतक-यांनी आपले नाव नोंदवावे व शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी यावेळी केले.
उपजिल्हाधिकारी (रोहयो) ज्ञानेश भट, उपसंचालक (रेशीम) महेंद्र ढवळे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे, कुहीचे माजी पंचायत समिती सभापती अरुण हटवार, जिल्हा परिषद सदस्या शांता कुमरे, वरिष्ठ तांत्रिक सहायक रजनी बन्सोड, क्षेत्र सहायक भास्कर उईके, वरिष्ठ सहायक प्रफुल गाऊत्रे आदी यावेळी उपस्थित होते. उपसंचालक(रेशीम) महेंद्र ढवळे यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले.
राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभाग तसेच नागपूर येथील रेशीम संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात महारेशीम अभियान 2023 राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत रेशीम उद्योग करू इच्छिणा-या शेतक-यांनी 15 डिसेंबरपर्यंत नाव नोंदणी करावयाची आहे. पात्र शेतक-यांना एक एकर तुती लागवडीकरिता 500 रुपये नोंदणी शुल्क भरून आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करणे आवश्यक आहे. रेशीम उद्योग हा शेती आधारित असल्याने शेतक-यांच्या मागणीनुसार स्वतःच्या शेतीवर कामकाज करून त्या शेतात केलेल्या कामकाजाची मजुरी शासनाकडून मनरेगाच्या नियमानुसार दिली जाते