नागपूर :- केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘मेरी माटी, मेरा देश’ हा उपक्रम संपूर्ण देशात राबविण्यात येणार आहे. नागपूर शहरात या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासंदर्भात आवश्यक नियोजन करण्याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्देशीत केले. तसेच या उपक्रमात नागरीकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत ‘मेरी माटी, मेरा देश’ या उपक्रमाच्या संदर्भात अंमलबजावणी करण्याकरीता त्यांनी शुक्रवारी (ता.२८) समिती गठित करुन मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभागृहात बैठक घेतली. बैठकीत अतिरिक्त आयुक्त निर्भय जैन, उपायुक्त सुरेश बगळे, रवींद्र भेलावे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, माहिती व तंत्रज्ञान विभाग संचालक महेश धामेचा, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी व स्वप्नील लोखंडे उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ‘मेरी माटी, मेरा देश’ या उपक्रमांतर्गत अमृत सरोवर (तलाव) येथे शिलालेख लावणे, पंचप्रण प्रतिज्ञा घेणे व सेल्फी काढणे, वसुंधरा वंदन करणे, वीरांना वंदन करणे आणि ध्वजारोहन व राष्ट्रगान या बाबींची अंमलबजावणी करणे आहे. त्यानुसार शहरात या सर्व घटकांची अंबलजावणी व्हावी, याकडे लक्ष देणे तसेच शहरातील सोनेगाव तलाव, अंबाझरी तलाव, गांधीसागर तलाव, सक्करदरा तलाव, फुटाळा तलाव, नाईक तलाव आणि पोलीस लाईन तलाव येथे शिलालेख उभारण्याचे मनपा आयुक्तांनी निर्देश दिले. तलावांच्या परिसरात उभारण्यात येणा-या शिलालेखांवर वीर स्वातंत्र्य सैनिकांचे, देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या जवानांचे नाव राहतील.
शहरातील विविध ७५ ठिकाणी सेल्फी पॉईंट उभारून पंचप्रण प्रतिज्ञा घेताना नागरिकांना आपल्या हातात मातीचा दिवा घेऊन प्रतिज्ञा घ्यायची आहे. शाळा, महाविद्यालय तसेच विविध ठिकाणी सेल्फी पॉईंट उभारण्यात येतील. यासाठी महिला बचत गट आणि विविध सामाजिक संस्थांची मदत घेण्याचे निर्देशही मनपा आयुक्त तथा प्रशासकांनी दिले. उत्कृष्ट सेल्फीला मनपातर्फे पुरस्कृत करण्यात येईल. शहरातील ७५ ठिकाणी खुले मैदान, उद्यान येथे वसुंधरा वंदन अंतर्गत विविध प्रजातींचे वृक्षारोपण करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. त्यासोबत चिंचभवन येथील ‘अमृत वाटिका’ येथे सुद्धा वृक्षारोपण करण्यात येईल. नागरिकांना वृक्षारोपण करण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता त्यांना नि:शुल्क वृक्ष सुद्धा देण्यात येतील. त्याचप्रमाणे ‘वीरों का वंदन’ अंतर्गत नागपूर शहरातील स्वातंत्र्य सैनिक, सेनेचे वीर जवान किंवा त्यांच्या परिवारातील सदस्यांचा सत्कार करण्याचे देखील निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.