मोदी सरकारच्या काळात मुंबई पूर्णपणे दहशतवादमुक्त – परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांचे प्रतिपादन

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे दहशतवाद मुक्त आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळे पाकव्याप्त काश्मीरही भविष्यात भारताचा भाग होईल, असा विश्वास परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी शनिवारी मुंबईत व्यक्त केला.

उत्तर मुंबईतील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल आणि अन्य उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंबईत आलेल्या डॉ. एस. जयशंकर यांनी बीकेसी येथील ‘एनएसई’ मध्ये पत्रकारांशी संवाद साधला. प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते. यावेळी डॉ. एस. जयशंकर म्हणाले, मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत केलेली कामे जनतेसमोर आहेत. या कालावधीत पायाभूत सुविधा किती प्रमाणात वाढल्या आणि किती प्रगती झाली, ते मतदार अनुभवतो आहे. मोफत आरोग्य उपचार घर, मुद्रा कर्ज, आणि स्वनिधी यात मोठी वाढ होणार आहे. मोदींच्या काम करण्याच्या आणि आश्वासने पूर्ण करण्याच्या हमीवर भाजपा मतदारांचे आशीर्वाद मागत आहे.

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याची बाजू मांडायचे काम कोणी केले,कोणती विचारधारा दहशतवाद्यांविरोधात लढतेय, याचा मतदारांनी विचार केला पाहिजे. भाजपाच्या दहशतवादविरोधी धोरणामुळेच आज दहशतवादी कारवायांना आळा बसला आहे असे डॉ. एस. जयशंकर म्हणाले.

भाजपा सरकारने कलम 370 हटवण्याचे काम केले.परिणामी काश्मीरमध्ये सुधारणा होऊ लागल्या आहेत. आता पाकव्याप्त काश्मीरमध्येही काही घटना घडू लागल्या आहेत. एक दिवस तोही भारताशी जोडला जाईल, असा विश्वास डॉ. एस. जयशंकर यांनी व्यक्त केला.

भाजपा आणि महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर गती देणारे निर्णय घेतले.अनेक योजनांद्वारे व्यवसायवृद्धी घडवून आणल्याकडे श्री.जयशंकर यांनी लक्ष वेधले.

आजमितीस देशात दररोज 28 किमी लांब महामार्ग आणि 14 किमी लांब रेल्वे मार्गाचे काम होते. दहा वर्षांत विमानतळांची संख्या दुप्पट झाली. भारताच्या प्रगती आणि तंत्रज्ञानाचे संपूर्ण पॅकेज जनतेसमोर आहे. जनता त्याचा नक्कीच विचार करेल, असे डॉ. एस. जयशंकर यांनी नमूद केले.

चीनच्या ताब्यात भारताची भूमी हे तर नेहरूंचे पाप

चीनने भारताचा भूभाग बळकावला तो 1958 ते 1963 या काळात. त्यावेळी जवाहरलाल नेहरू पंतप्रधानपदी होते. मात्र भारताचा हा भूभाग मोदी सरकारच्या काळात चीनने बळकावल्याचा कांगावा करीत काँग्रेस नेहरूंच्या चुकांचे खापर मोदी सरकारवर फोडत आहे. त्यांना का करत राहू द्या, आम्ही राजनैतिक मार्गाने आमचे काम करत राहू, असे डॉ. एस. जयशंकर यावेळी म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हास्तरीय पावर लिफ्टिंग व बेंच प्रेस स्पर्धेचा समारोह

Tue May 14 , 2024
नागपूर :- फिटनेस गॅरेजचे अमर देवार यांनी “स्ट्राँग मॅन ऑफ नागपूर 2024” या प्रतिष्ठेच्या विजेतेपदाचा दावा केला, तर रीलोड जिमच्या अल्फिया शेखने गुणांची बरोबरी करत नागपूर जिल्ह्याच्या वरिष्ठ विभागात जोरदार स्पर्धा झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये “स्ट्राँग वुमन ऑफ नागपूर 2024” हा किताब पटकावला. नागपूर जि.पॉवरलिफ्टिंग असो. 4 आणि 5 मे 2024 रोजी सदर नागपूर येथे 15 जिल्ह्यांच्या व्यायाम शाळेतील एकूण 85 पॉवरलिफ्टर्सनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com