– विद्यापीठात शिक्षक, अधिकारी, कर्मचारी निरोप समारंभ
नागपूर :- कर्तव्य बजावत असताना शिस्तीचे पालन केल्यास सन्मान मिळत असल्याचे प्रतिपादन प्र- कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झालेले शिक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात मंगळवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरु डॉ. दुधे मार्गदर्शन करीत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना डॉ. दुधे यांनी माणूस हा उत्कृष्ट अभिनेता असल्याचे सांगत नोकरीचे पात्र संपले असून पुढील जेष्ठ नागरिक म्हणून पात्र सुरू होते. वरिष्ठ नागरिक म्हणून जगण्याचे पात्र फार कठीण कार्ड असतो, असे ते म्हणाले. मात्र, समाज तसेच संपर्काचा फायदा घेऊन जीवनात सुखी होता येते असे प्र-कुलगुरु म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी केलेल्या कार्याचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे असे म्हणत कुलगुरूंनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुढील आयुष्य करिता शुभेच्छा दिल्या.
ज्या कार्यक्रमात जीवरसायन शास्त्र विभागातून प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेले डॉ. वीरेंद्र गोविंदराव मेश्राम, इंग्रजी विभागातील प्राध्यापक डॉ. धरमदास मारुती शेंडे, बॅरि. शेषराव वानखेडे शिक्षण महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. शुभांगी अविनाश रोडे, कुलगुरू कार्यालयातील उपकुलसचिव प्रदीप मधुसूदन बिनीवाले, कुलगुरू निवासस्थान येथील चपराशी दिनकर दौलतराम क्षीरसागर व सामान्य परीक्षा विभागातून फर्रास पदावरून सेवानिवृत्त झालेले गणेश बबनराव नेरकर यांचा सहपत्नीक प्रमुख अतिथींच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती डॉ. धरमदास मारुती शेंडे व प्रदीप मधुसूदन बिनीवाले यांनी मनोगत व्यक्त केले. मनोगतातून त्यांनी विद्यापीठांमध्ये दिलेल्या प्रदीर्घ सेवेचा अनुभव विशद केला. कार्यक्रमाचे संचालन दीपक घोडमारे यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी मानले.