– ‘सांज शब्दांची’ काव्य मैफिलीचे उद्घाटन
– विविध कवितांनी रसिक मंत्रमुग्ध
नागपूर :- दर दहा कोसावर बोलीभाषेत बदल होत असून आपल्या महाराष्ट्रात विविध भागात वेगवेगळ्या बोलीभाषा बोलल्या जातात. त्यात विदर्भातील बोलीभाषेने आपले वेगळेपण जपले आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज येथे केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा २०२४ निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात आयोजित केलेल्या ‘सांज शब्दांची’ काव्यमैफलीचे उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी अपर जिल्हाधिकारी आशा पठाण, उपायुक्त धनंजय सुटे, घनश्याम भुगावकर, चंद्रभान पराते, अमरावतीचे कवी नितीन देशमुख, यवतमाळ येथील हबिद शेख, सहायक आयुक्त दीपक वांजरे,पोलिस उप अधिक्षक पांडुरंग सोनोने प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी विभागीय आयुक्त बिदरी म्हणाल्या की, दर दहा कोसावर बोली भाषा बदलत असते. यात विदर्भातील बोली भाषेने आपले वेगळेपण जपले आहे. विदर्भातील माणूस कुठेही गेला तर आपल्या बोलीभाषेवरून ओळखला जातो. त्यामुळे प्रत्येक भागातील भाषेचे महत्व टिकून राहणे आवश्यक आहे. त्याकरीता मराठी भाषेचे संवर्धनासाठी अशाप्रकारचे कार्यक्रम नेहमी आयोजित करणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.
मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी भाषा संचालनालयाच्या वतीने मराठी भाषा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे.
यावेळी अमरावतीचे कवी नितीन देशमुख, यवतमाळ येथील हबिद शेख यांनी विविध कवितांचे उत्कृष्ठ सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
हबिद शेख यांच्या लोक का शोघतात माणसे माणसामध्ये राहतात माणसे धन्य ते लोक जे जोडतात माणसे या कवितेला रसिकांनी भरभरून दाद दिली.
घर हद्याचे सोडून गेली या नितीन देशमुख यांच्या प्रेम कवितेने रसिकांनी उत्तम दाद दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक वांजरे यांनी केले. कार्यक्रमाला अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.