नागपूर : ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवतींना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शासनाच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा जास्तीत जास्त नवउद्योजकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उद्योग संचालनालय बाष्पके मुंबईचे सहसंचालक योगेश कुंभलवार यांनी केले.
जिल्हा उद्योग केंद्रामार्फत 14 फेब्रुवारी रोजी व्यवसाय सुलभीकरण एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन कै.आबासाहेब खेडकर सभागृह येथे करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेला उद्योग व व्यवसाय सुलभीकरण कक्षाचे सल्लागार अनिरबन दत्ता, मैत्री कक्षाच्या रिना मिरंडा, जिल्हा उद्योग केंद्र नागपूरचे महाव्यवस्थापक शिवकुमार मुद्दमवार, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक डी.एम.चोरघडे, ए.टी.पाटील यांची उपस्थिती होती.
कुंभलवार पुढे बोलताना म्हणाले, मागील अनेक वर्षामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये नवनवीन बदल होत आहे. उद्योजकांच्या कक्षा विस्तारीत आहे यामुळे एखाद्या उपक्रमाचा विकास संघटन व व्यवस्थापन करण्याची क्षमता, उद्योग आणि त्यात येणाऱ्या जोखमीसह व्यवस्थापन (इनोव्हेशन मॅनेजमेंट) असल्याशिवाय उद्योगाला गती प्राप्त होणार नाही यामुळे नवीन पॉलिसीचा स्विकार नवउद्योजकांनी करावा असे ते यावेळी म्हणाले.
या कार्यशाळेमध्ये रिना मिरंडा यांनी मैत्री कक्षाच्या व्यवसाय सुलभीकरण पोर्टलविषयी माहिती दिली. तसेच आय.टी पातळीवर आणि नियामक पातळीवर केल्या जाणाऱ्या विविध सुधारणा विषयी व शासनाने राबविलेल्या सुधारणेची माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित उद्योजकांनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शिवकुमार मुद्दलवार यांनी केले तर आभार व्यवस्थापक डी.एम.चोरघडे यांनी मानले.