संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
शासनाच्या वतीने त्वरित आर्थिक नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
कामठी :- गेल्या तीन दिवसापासून तालुक्यात होत असलेल्या परतीच्या अवकाळी वादळी मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात सोयाबीन – कापूस पिकाचे नुकसान झाल्याने बळीराजाच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहत असून शासनाच्या वतीने त्वरित आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कामठी तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे काल 61.8 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद असून कोराडी मंडळ 34.2, वडोदा मंडळ 55.2, दिघोरी मंडळ 62.2, कामठी मंडळ 95.2 एकूण 61.8 मिमी मुसळधार पाऊस पडल्यामुळे तालुक्यात सोयाबीन कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यापूर्वीही जुलै -ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती त्यामुळे रासायनिक खत, औषधी, बी बियाणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते शासनाच्या वतीने त्वरित आर्थिक नुकसान भरपाई मिळणार असल्याचे पंचनाम्यादरम्यान सांगितले होते, तालुक्यात यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन पिकाचे 3020 हेक्टर मध्ये नियोजन करण्यात आले होते तर कापूस पिकाचे 5885 हेक्टर मध्ये शेतकऱ्यांनी कापूस पेरणीचे नियोजन केले होते मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी बी बियाणे, रासायनिक खत औषधाची जुळवा जुळव करून पेरणी केली होती जुलै ऑगस्ट महिन्यात आलेल्या वादळी मुसळधार पावसाने नदी काठावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते परत शेतकऱ्यांनी बी बियाणे व रासायनिक खत, औषधाची जुळवा जुळव करून दुबार पेरणी केली. मोठ्या आशेने सोयाबीन कापूस पिक डोलू लागली फुल व बोंड लागण्याचे स्थितीत असताना व सोबतच सोयाबीन पीक कापणीला आले असताना गेल्या तीन दिवसापासून तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसाने कापूस व सोयाबीन नगदी पीक समजल्या जाणाऱ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पीकाची दयनीय अवस्था बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहत आहेत सतत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शासनाच्या वतीने त्वरित पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
अवकाळी पावसामुळे नुकसानीचे पंचनामे सुरू असून जुलै -ऑगस्ट महिन्यात नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सात कोटी रुपये मंजूर झाले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करने सुरू असल्याचे तहसीलदार अक्षय पोयाम यांनी सांगितले आहेत गेल्या तीन दिवसापासून तालुक्यात होत असलेल्या अवकाळी मुसळधार पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आर्थिक नुकसानाचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अक्षय पोयाम यांनी सांगितले आहेत.