राज्यात अधिकाधिक कुशल मनुष्यबळ निर्माण करणार – मंत्री मंगलप्रभात लोढा

– पी.एम. विश्वकर्मा योजनेच्या १०१ कौशल्य केंद्रांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेला ओळख प्राप्त करून देणारी विश्वकर्मा सन्मान योजना देशात सुरू केली आहे. विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेतही महाराष्ट्र अग्रेसर राहील, असा विश्वास आहे. या योजनेत जास्तीत जास्त होतकरू तरुणांनी सहभागी व्हावे. या योजनेअंतर्गत २०२८ पर्यंत तीन लाख कारागिरांना विकासाच्या प्रवाहात आणणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेंतर्गत राज्यातील १०१ केंद्रांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते रिमोटद्वारे शुभारंभ करण्यात आला.

विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेतून राज्यात नवनवीन स्टार्टअपही सुरू व्हावेत. या स्टार्टअपनी जागतिक स्पर्धेत उतरावे. पी. एम. विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजेनेच्या पहिल्या टप्प्यात १५ जिल्ह्यांतील १०१ तुकड्यांना हे प्रशिक्षण देतोय. आगामी काळात अन्य जिल्ह्यांतही या प्रशिक्षणाचा विस्तार करण्यात येईल. त्याला सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.   

कौशल्य विकास विभाग राज्यात जास्तीत जास्त कुशल मनुष्यबळ विकसित करण्यावर भर देत असून, राज्यात ५११ प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रे सुरू झाली आहेत. आज पी. एम. विश्वकर्मा सन्मान योजना देखील १५ जिल्ह्यात १०१ ठिकाणी सुरू करत आहोत. यापुढे ही संख्या वाढविण्यात येईल. नमो महारोजगार मेळावे, रोजगार मेळावे यातून अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन प्रत्येक हाताला काम देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मत यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले आहे.

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना प्रमुख वैशिष्ट्ये

विविध १८ व्यवसायांच्या लाभार्थ्यांना ५ दिवसांचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना संबंधित व्यवसायाच्या टूलकिटसाठी १५ हजार रुपयांचे ई-व्हाऊचर विद्यावेतन देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर पात्र लाभार्थ्यांना एक लाख रकमेचे ५ टक्के व्याजदराने कर्ज मिळेल.पहिल्या हप्त्याच्या कर्जाची परतफेड नियमित असल्यास लाभाथ्यांना पुढील रू. दोन लाख रकमेचे ५ टक्के व्याजदराचे कर्ज मिळेल. वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणास सुरुवात करण्यात येणार आहे.राज्यातील 15 जिल्ह्यांमधील 101 प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणात सुरुवात करण्यात येणार आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी, महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेद मनी, केंद्रीय कौशल्य विकास विभागाचे सचिव अतुल तिवारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. कार्यक्रमाला कौशल्य विकास विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे संचालक योगेश पाटील, राज्यातील १५ जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी, विश्वकर्मा केंद्राचे संचालक, स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे अधिकारी, प्रशिक्षणार्थी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

२०४७ पर्यंत भारताला विकसित राष्‍ट्र करण्‍याच्‍या दृष्‍टीने असलेला अर्थसंकल्‍प - ना. सुधीर मुनगंटीवार

Fri Feb 2 , 2024
नागपूर :-आज देशाच्‍या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी देशाचा अंतरीम अर्थसंकल्‍प सादर केला. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्‍ट्र करण्‍याच्‍या दृष्‍टीने असणा-या योजना ही या अर्थसंकल्‍पाची विशेषता आहे. मागील १० वर्षात देशाच्‍या सर्व घटकांच्‍या सर्वांगिण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक योजना चालविल्‍या, ज्‍यामुळे गरीब, तरूण, महिला, शेतकरी, दिव्‍यांग यांच्‍या जिवनात आमुलाग्र बदल झाला आहे. या अर्थसंकल्‍पात पुढील ५ वर्षात गरीबांसाठी २ कोटी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com