– नास्वी च्या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्र्यांचे प्रतिपादन
मुंबई :- नास्वी या संस्थेने मुंबईतील फेरीवाल्यांच्या स्थानिक संस्थांसोबत बांद्रा येथील रंगशारदा हॉल मध्ये एका मल्टी स्टेक होल्डर बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये कॅबिनेट मंत्री हरदीप सिंग पुरी, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री, भारत सरकार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबतच इतर मान्यवरांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. शंकर गोरे, उपायुक्त, महानगरपालिका प्रशासन संचालनालय, वर्षा दीक्षित, उपायुक्त ठाणे महानगरपालिका, संघरत्ना खिल्लारे, उपायुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका,रवींद्र जाधव, राज्य अभियान व्यवस्थापक, पीएम-स्वनिधी, कामेश सांघी, आजीविका-संचालक, अमेरिकन इंडिया फाउंडेशन, अरविंद सिंह, नॅशनल असोशिएशन ऑफ स्ट्रीट वेंडर्स ऑफ इंडिया, दयाशंकर सिंह, आझाद हॉकर्स युनियन आणि गुरुनाथ सावंत, नास्वी संस्था आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीमध्ये जवळपास १,००० हून अधिक फेरीवाले त्यांच्या नेतृत्वासहीत उपस्थित होते. ज्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील फेरीवाल्यांच्या समस्या आणि पीएम स्वनिधीचा फायदा याबाबत आपली मते व्यक्त केली.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, यांनी आश्वासन दिले की ते सर्वेक्षण, विक्री प्रमाणपत्र, पथ विक्रेता समितीचे प्रभावी कार्य आणि तक्रार निवारण समितीच्या स्थापनेच्या मुद्द्यांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतील. त्याचसोबत त्यांनी पीएम स्वनिधी योजनेची यशस्वी अंमलबजावणी, स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांची मेहनत यावर देखील प्रकाश टाकला. तसेच मुंबई आणि महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित करून पथविक्रेत्यांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्नशील राहू असे आश्वासन देखील त्यांनी याप्रसंगी दिले.
नास्वीचे राष्ट्रीय समन्वयक अरबिंद सिंग यांनी रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या संरक्षणाची सध्या गरज असल्याचे सांगत तक्रार निवारण समिती, पथविक्रेता समिती आणि पीएम स्वनिधीद्वारे फेरीवाल्यांना आधार व प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या प्रयत्नांचे देखील स्वागत केले आणि आभार मानले. या बैठकीमध्ये फेरीवाल्यांचे प्रभावी नेतृत्व असलेले नेते आणि आझाद हॉकर युनियनचे संस्थापक दयाशंकर सिंग यांना हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.