![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
नागपूर :- नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षा ॲड. नंदा पराते यांच्या नेतृत्वात पावसाळ्यापुर्वी नागपूर शहरातील नदी आणि नाले व विहीरींची साफ सफाईची कामे युद्धपातळीवर करण्यात यावे आणि नागरिकांचे जिवन सुरक्षित करावे म्हणून नागपूर महानगरपालिकाचे आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ॲड. नंदा पराते यांनी मनपाचे अपर आयुक्त यांचेशी निवेदनावर चर्चा करतांना शिष्टमंडळात नफिसा अहमद, छाया सुखदेवे, मंजू पराते, मंदा शेंडे, शकुंतला वठ्ठीघरे, जयश्री धार्मिक, वैशाली अड्याळकर, रेखा बरवड, गिता हेडाऊ, पुष्पा शेंडे, माया धार्मिक, दिपाली अड्याळकर यांच्यासह महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
शहरातील नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदी या तिन्ही प्रमुख नद्यांची व नाल्यांची सफाई पूर्ण झालेली नाही म्हणून मनपाने पावसाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे नदीच्या व नाल्यांच्या प्रवाहाला अडथळा होऊ नये व सुरळीतरित्या पाणी वाहून जावे यादृष्टीने नागपूर शहरातून वाहणाऱ्या नदी आणि नाले सफाईची कामे पावसाळ्यापुर्वी पुर्ण करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली.
ॲड. नंदा पराते म्हणाल्या की नदी व नाल्यांच्या स्वच्छतेवर भर देऊन जास्तीत जास्त गाळ काढण्याची कृती केलेली नाही तर पावसाळ्यात शहरातील अनेक खोलगट वस्तीमध्ये व सिमेंट रस्त्यांचा बाजूकडील नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी गेल्याने प्रचंड आर्थिक नुकसान नागरिकांना होणार आहे.
महिला काँग्रेसच्या निवेदनातून मनपाने नदी, नाल्यांची खोल सफाई अद्यापही पूर्ण केलेली नाही. शहराच्या काही भागात नालेसफाईची केवळ औपचारिकता पूर्ण केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.असा आरोप केला आहे.
नागपूर महापालिकाकडून शहरातील काही भागातील नाल्यातील स्वच्छता व नालेसफाईला सुरूवातही झालेली नसल्याचे चित्र आहे. गंगाबाई घाट नाल्याला लागूनच भुतेश्वरनगर, शिवाजीनगर, नंदाजीनगर ह्या झोपडपट्या आहेत. पावसाळ्यात या नाल्याचे पाणी या वस्त्यांमध्ये शिरते. नागपुरातील मोठ्या व लहान नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा असल्यामुळे पावसाळ्यात नागपूर शहरातील नागरिकांना मोठ्या संकटांना तोड द्यावे लागण्याची शक्यता आहे. अजूनही अनेक भागातील नाल्यापर्यंत महापालिकेची यंत्रणा पोहोचली नाही. मनपाकडून नाली सफाई केवळ औपचारिकता पुर्ण करण्यात येत आहे त्यामुळे पावसाळ्यात हजारो नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून मनपाने पुन्हा एकदा सफाई करावी, अशी मागणी नागपूर मनपाचे आयुक्त यांना नागपूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ॲड. नंदा पराते यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळासह महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. मनपाने त्वरीत दाखल घावी अन्यथा महिला काँग्रेस उग्र आंदोलन करेल असा इशारा दिला.