– मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले नदी सफाई अभियानाचे निरीक्षण
नागपूर :– नागपूर शहरातून वाहणा-या नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदी या तिनही नद्यांच्या स्वच्छतेचे काम सुरू आहे. या सफाई अभियाना अंतर्गत नदीच्या प्रवाहात येणारे अडथळे दूर करून प्रवाह सुरळीत करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. तसेच त्यांनी पुरामुळे कोसळलेल्या नदीच्या सुरक्षा भितींच्या बांधकाम प्रकियेला विविध स्त्रोतातून निधी प्राप्त करून सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
शहरात सुरू असलेल्या नदी स्वच्छता अभियानांतर्गत शुक्रवारी (ता.२) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सफाई कार्याचे निरीक्षण केले. त्यांनी नाग नदीचे अंबाझरी दहनघाट, अशोक चौक आणि पारडी चौक येथील पात्रांच्या सफाई कार्याची पाहणी केली. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, धरमपेठ झोनचे कार्यकारी अभियंता विजय गुरूबक्षाणी, गांधीबाग झोनचे कार्यकारी अभियंता सचिन रक्षमवार, लकडगंज झोनचे कार्यकारी अभियंता संजय माटे, उपअभियंता देवेंद्र भोवते, कनिष्ठ अभियंता सर्वश्री मनोहर राठोड, मिलींद गवारके, संतोष मिगीलवार, मुख्य स्वच्छता अधिकारी सुरेश खरे, प्रमोद आत्राम आदी उपस्थित होते.
नागपूर शहरातील नद्यांची सखोल स्वच्छता व्हावी यादृष्टीने मनपाद्वारे नदी स्वच्छता अभियानाला सुरूवात करण्यात आली. नदी स्वच्छतेसाठी ६ चमू तयार करण्यात आलेल्या असून प्रत्येक चमूमध्ये मशीनचा समावेश आहे. मनपाचे तसेच भाडेतत्वारील पोकलेन, टिप्पर याद्वारे नदींची सफाई केली जात आहे. अतिरिक्त पाउस आल्यासही पूर परिस्थिती उद्भवू नये याकरिता नद्यांची जास्तीत जास्त पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढावी यासाठी नद्यांमधील गाळ काढण्यात येत आहे. या सर्व कार्यावर देखरेखीसाठी संबंधित झोनमधील कनिष्ठ अभियंत्यांकडे जबाबदारी निश्चित केलेली आहे. मे महिन्यापर्यंत नाग नदी, पिवळी नदी तसेच पोहरा नदी या तिनही नद्यांच्या निर्धारित टप्प्यांची सखोल स्वच्छता केली जाईल, असा विश्वास यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला.
नागपूर शहरात सप्टेंबर महिन्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे अनेक भागात नद्यांच्या सुरक्षा भिंती कोसळल्या. पावसाळ्यात नद्यांचे पाणी रस्त्यावर, घरांमध्ये जाउ नये याकरिता या सुरक्षा भितींच्या बांधकामाच्या कार्यवाहीला देखील गती देण्यात आलेली आहे. यासाठी जिल्हा नियोजन समिती तसेच मनपा निधीमधून सुरक्षा भिंत बांधकाम कार्य केले जाणार आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य सरकारकडे देखील यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आलेला असून सदर प्रस्ताव मान्यतेच्या अंतिम टप्प्यात असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले.