![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
– मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक; आंतराज्यीय आढावा बैठक
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
नागपूर :- मध्यप्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीतील कोणतेही गैरप्रकार मध्यप्रदेश – महाराष्ट्र सीमावर्ती भागात होणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर दोन्ही राज्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आज नागपूर येथे पार पडली. सीमावर्ती भागात विशेष दक्षता घेण्याचे या बैठकीत ठरले.
शनिवारी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनमध्ये सीमावर्ती भागात काम करणाऱ्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबतच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, छिंदवाडा जिल्हाधिकारी शितल पटले, शिवणीचे पोलीस अधिक्षक रामजी श्रीवास्तव, नागपूर ग्रामीण पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अतिरिक्त जिल्हाधिकार आशा पठाण, छिंदवाडा पोलीस अधिक्षक विनायक वर्मा, अमरावतीचे रामदास सिद्दभटटी, प्रभात मिश्रा, श्रेयांश कुमत, राजु रंजन पांडे, पी. एस. वारले, रोहित लखासे, यांच्यासह महसूल, गृह व निवडणूक विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सीमावर्ती भागातील उपविभागीय अधिकारी, महसूल,पोलीस अधिकाऱ्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहून निवडणूक काळात होणारी अवैध कामे तसेच दारू व पैशांचा वापर यावर नियंत्रण पथकाने विशेष लक्ष देण्याच्या सूचना या बैठकीमध्ये देण्यात आल्या.
निवडणूक कालावधीमध्ये नियंत्रण पथक, भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथक, स्थिर व्हिडिओ चित्रीकरण पथक,यांनी या कालावधीमध्ये मदत करावी तसेच फरार आरोपी,अवैध धंदे करणारे तडीपार,अटक वॉरंट जारी करण्यात आलेले आरोपींना या कालावधीत शोध घेण्यासाठी मध्यप्रदेशच्या चौरई, सोंसर, पांढुर्णा येथील पोलीस अधिकाऱ्यांनी नागपूर पोलीस विभागाला आरोपीच्या नावासह माहितीची देवाण – घेवाण करावी, जेणेकरुन त्यांचा शोध घेणे सोपे होईल. सीमावर्ती भागातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्राची माहिती यावेळी राज्य शासनाला देण्यात आली.
नागपूर जिल्ह्यातील मध्यप्रदेश राज्याशी संलग्न असलेल्या रामटेक, सावनेर, पारशिवणी, नरखेड, देवलापार या भागातील पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यावेळी उपस्थित होते. विधासभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी सतर्क राहण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.