राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या दोन दिवसांपासून अनेक घडामोडी घडल्या. अखेर शरद पवार यांनी आज गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पक्षातील विविध घडामोडींवर भूमिका मांडण्यासाठी सविस्तर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपण अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याची मोठी घोषणा केली.
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज अखेर पत्रकार परिषद घेऊन गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या विविध घडामोडींवर भाष्य केलं. शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी ‘लोक माझ्या सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी आपल्या पक्षाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडत होता. शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्ते आणि दिग्गज नेत्यांनी शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. पण पवारांनी ती विनंती मान्य केली नाही. त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. या घडामोडींवर आज अखेर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडली.
“मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरीता माझे हितचिंतक माझ्यावर विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटीत होवून एकमुखाने मला आवाहन केलं. त्याचबरोबर जनमनातून, विशेषत: महाराष्ट्रातून विविध पक्षाचे सहकारी आणि कार्यकर्ते मी अध्यक्ष होण्याची जबाबदारी घ्यावी अशी विनंती केली. लोक माझ्या सांगाती हे माझ्या सामाजिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडे जवभावनांचा अनादर होऊ शकत नाही”, अशी भावना शरद पवार यांनी व्यक्त केली.
“आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेलं आवाहन तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीमुळे, या संदर्भात त्यांनी घेतलेला निर्णय माझ्यापर्यंत पोहोचवण्यात आला. या सर्वांचा विचार करुन मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे, या निर्णयाचा मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे”, अशी घोषणा शरद पवार यांनी केली.
“माझी जबाबदारी नैतिक अशी होती. मी सर्वांना विश्वासात घेतलं असतं तर त्यांनी परवानगी दिली नसती. पण मी त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं, हे मी मान्य करतो. राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया उमेटल हे माहिती होती. पण इतकी तीव्र प्रतिक्रिया उमेटल असं वाटत नव्हतं”, असं शरद पवार म्हणाले.