संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त तेजस बहुउद्देशीय संस्था, कामठी तर्फे छत्रपती शिवाजी चौक, शुक्रवारी बाजार, कामठी येथे क्रांतिकारी अमर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात चंद्रशेखर आझाद यांचे नातू हेमंतराव मलकपुरकर, भगतसिंग यांच्या लहान भावाचा मुलगा किरण सिंग, बाळ गंगाधर टिळक यांचा नातू शैलेश टिळक, शहीद अशफाक उल्लाह खान यांचे नातू अशफाक उल्लाह खान, क्रांतिकारी रामकृष्ण खत्री यांचे नातू शैलेंद्र चोपडा(खत्री),राजगुरू यांचे नातू प्रशांत राजगुरू, क्रांतिकारक सचिंद्रनाथ बक्षी यांची नातीन मीना बक्षी , क्रांतिकारी जयदेव कपूर यांचे नातू मयूर कपूर, शहीद राम नारायण आझाद यांचे नातू सुनील आझाद आदींना तेजस संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह आणि क्रांतिकारकांचे तैलचित्र देवून सन्मानित करण्यात आले.
स्वातंत्र्यानंतर विदर्भाच्या भूमीवर पहिल्यांदाच चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, यांचे वंशज आणून इतिहास रचला गेला. कामठी, नागपूर, कन्हान अशा अनेक संस्थांनी पुढे येत त्यांचा सन्मान केला. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले, एवढ्या संकटातून ते कसे गेले, आपल्या देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले, ते स्वातंत्र्यासाठी कसे लढले, याची आठवण सांगताच त्यांच्या डोळ्यांतून अश्रू तरळले. ते म्हणाले, असा सन्मान भारतीय भूमीवर पहिल्यांदाच घडला आहे. तेजस बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक चंद्रशेखर अरगुलेवार यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, संघटनेने 25 क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांना निमंत्रण पत्रे पाठवली होती आणि मी स्वतः निमंत्रण पत्रे घेऊन लखनौला गेलो होतो. अनेक परिश्रमानंतर 23 जानेवारी रोजी आमच्या निमंत्रणावरून हा क्षण आम्हाला लाभला ही आमच्या करीता अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले. अनेक संस्थांनी अरगुलेवार यांचा या स्तुत्य कार्याबद्दल गौरव केला.हे कार्य यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार, जीवन रक्षापथक प्रमुख पुरुषोत्तम कावळे, उपाध्यक्ष देविदास पेटरे, सचिव किसन अरगुलेवार, मार्गदर्शक एम.ए.जब्बार, शंकर बर्मन, मिसबाह रेहमान, रोहन खोब्रागडे, नावेद आझमी, सुरेंद्रसिंग नेगी यांनी अथक प्रयत्न केले.