यवतमाळ :- केंद्र सरकारने लागू केलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार करून तयार केलेले धोरण आहे. देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती करणारे हे धोरण शैक्षणिक प्रगतीची उज्ज्वल दिशा स्पष्ट करणारे आहे. शिक्षक, प्राध्यापकांनी या धोरणाचा अभ्यास करून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान द्यावे, असे प्रतिपादन यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमदेवार राजश्री हेमंत पाटील-महल्ले यांनी केले.
दारव्हा येथील मुंगसाजी महाराज महाविद्यालयात शिक्षक व प्राध्यापकांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. प्राध्यापकवर्ग नवीन शैक्षणिक धोरणबाबत सकारात्मक असल्याचे बघून राजश्री पाटील यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. गेल्या अनेक वर्षांत देशातील शैक्षणिक धोरणात विद्यार्थी व शिक्षक हिताचा बदल झाला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण लागू करून ‘केजी टू पीजी’च्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार केला. मानसिक, शारिरिक, बौद्धीक वाढीला चालना देण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या अंगभूत कौशल्यांना वाव देणारे हे धोरण देशाच्या शैक्षणिक विकासात मैलाचा दगड ठरणार आहे, असे राजश्री पाटील म्हणाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण विषयक विचारांचा अंगीकार करत भारतातील प्रत्येक विद्यार्थी प्रज्ञावंत व्हावा, असे हे शैक्षणिक धोरण देशाच्या विकासाला नवी दिशा देणारे आहे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी राजश्री पाटील यांनी प्राध्यापकांशी संवाद साधून त्यांचेही म्हणणे जाणून घेतले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस वसंत घुईखेडकर, बोरीअरब कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विराज वसंत घुईखेडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष नयन लुंगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दारव्हा तालुकाध्यक्ष चरण पवार, मुंगसाजी महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास राऊत तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.