Ø कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण’ कार्यशाळा
नागपूर :- शासकीय आणि अशासकीय कार्यालयाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ झाल्यास पीडित महिलांनी मौन सोडून तक्रार नोंदविण्यासाठी पुढे यावे. तक्रार निवारण समिती प्रभावी झाल्यास पीडितांना न्याय मिळणे सुलभ होईल,असा सूर आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यशाळेत व्यक्त करण्यात आला.
महिला व बाल विकास विभाग राष्ट्रीय महिला आयोग व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण’ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत जनजागृती कार्यशाळेचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे करण्यात आले.
या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यालयामध्ये या संदर्भातील समिती स्थापन करणे आवश्यक आहे. त्याची माहिती लेखे स्वरूपात कार्यालयात असणे आवश्यक आहे. या कायद्यावर नियमित कार्यशाळा, प्रबोधन व चर्चा होणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक महिला कर्मचाऱ्यांना या कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे वातावरण बदलण्यास मदत होईल, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
कार्यशाळेला नवी दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या शितल बापट, महिला व बालविकास विभागाच्या विभागीय उपायुक्त अपर्णा कोल्हे, उपजिल्हाधिकारी पूजा पाटील, जिल्हा महिला बालविकास अधिकारी भारती मानकर, मिस्किन गौतम, चंद्रकांत बोंडे, मोरेश्वर झाडे, सरंक्षण अधिकारी मंजुषा रहाणे, सुवर्णा धानकुटे यांची उपस्थिती होत्या.
या वेळी कायदयाबाबत माहिती देताना उपजिल्हाधिकारी पूजा पाटील म्हणाल्या की, लैगिंक छाळाच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने अधिनियमामध्ये दिलेल्या तरतूदीनुसार चौकशी करावी. अंतर्गत तक्रार निवारण समितीने त्यांचा वार्षिक अहवाल तयार करुन महिला व बाल विकास विभागाला सादर करावा. कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छाळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी प्रत्येक कार्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत असावी, तक्रारीचे स्वरूप लक्षात येऊन त्यांची अंमलबजावणी करणे सूलभ होईल, प्रत्येक कार्यालयामध्ये विशाखा समिती कार्यरत असावी, कमी संख्या असणाऱ्या कार्यालयाने आपल्या तक्रारी स्थानिक तक्रार निवारण समितीकडे सादर कराव्यात. महिलांच्या प्रश्नांशी बांधील असलेल्या अशासकीय संघटनांनी छळाशी परिचित असलेली व्यक्ती यामधील एक सदस्य या समितीमध्ये असावा.
याप्रसंगी राष्ट्रीय महिला आयोगाच्या शितल बापट यांनी मार्गदर्शन केले. दृकश्राव्य सादरीकरणाच्या माध्यमातून महिलांनी लैगिंक छळापासून स्वत:चे रक्षण कसे करावे याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बालविकास अधिकारी भारती मानकर यांनी केले तर आभार मंजुषा रहाणे यांनी मानले.