नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागांतर्गत कर्णबधिर दिव्यांगांना कॉक्लियर इम्प्लांट (Cochlear Implant) शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत आहे, श्राव्य शक्ती निर्माण करण्यासाठी ० ते ६ वयोगटातील मुलांना शस्त्रक्रियेकरिता ६ लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येत असून, योजनेचा अधिकाधिक संख्येत लाभ घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, यावर्षी नागपूर शहरातील दिव्यांगासाठी सखोल सर्वेक्षण करण्याचा मनपाचा मानस असून, दिव्यांगाशी निगडीत भौतिक माहितीसोबत त्यांच्या सामाजिक व आर्थिक स्थिती बरोबरच त्यांना स्वावलंबी बनविण्याकरिता व त्यांची नैसर्गिक आवड व क्षमता प्रमाणे नवीन योजना सूरू करण्यात येणार आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात समाज विकास विभागांतर्गत दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यातील कर्णबधिर दिव्यांगांना कॉक्लियर इम्प्लांट (Cochlear Implant) शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य ही योजना राबविण्यात येत आहे. याबद्दल माहिती देत उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी सांगितले की, कर्णबधिरत्य/कर्णदीप हे भाषावाढीसाठी व वाचा विकासासाठी अत्यंत अडचणीचे ठरते. भाषा व वाचा विकासासाठी बुद्धीइतकीच निरोगी कार्णेद्रियांची गरज असते. जन्मतः कर्णबधिर असलेली मुले आजूबाजूच्या वातावरणातील तसेच बोलण्याचा आवाज ऐकू न आल्यामुळे बोलू शकत नाहीत. परिणामी त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य व भावनिक नुकसान होते. खरेतर योग्य वेळेत म्हणजेच जन्मानंतर लगेच शक्य तितक्या लवकर वय 0 ते 6 वर्षे यांच्यात निदान करून त्यांच्या कानावर कॉक्लियर इम्प्लांट (Cochlear Implant) सारखी शस्त्रक्रिया केल्यास आणि त्यासोबत ऐकण्या-बोलण्याचे प्रशिक्षण दिल्यास कर्णबधिर मुले इतर ऐकू येणाऱ्या मुलांसारखेच शालेय शिक्षण घेऊ शकतात. सर्वसामान्य मुलासारखे बोलू शकतात.
श्रवणदोष हा वेगवेगळ्या तीव्रतेचा असून जन्मतःच कर्णबधिरत्व (ऐकू न येणे) आलेल्या मुलांना तीव्र अतितीव्र प्रमाणात कर्णबधिरत्व आलेले असते. अशावेळी श्रवणयंत्र वापरणे पुरेसे ठरत नाही. अशावेळी कॉक्लियर इम्प्लांट (Cochlear Implant) शस्त्रक्रिया केल्यास त्यांना इतर मुलांइतकेच ऐकू येऊ शकते.
कॉक्लियर इम्प्लांट (Cochlear Implant) शस्त्रक्रियेसाठी एका रुग्णास किमान सहा लाख रुपये खर्च अपेक्षित असतो. याव्यतिरिक्त औषधोपचार, थेरपी, प्रशिक्षण व इतर चाचण्यांकरिता हा आवर्ती खर्च पालकांना करावा लागत असतो. ही खर्चिक शस्त्रक्रिया असल्यामुळे बऱ्याचदा कर्णबधीर व्यक्तींना त्यापासून वंचित रहावे लागते व त्याचा भाषा-वाचा विकास व शैक्षणिक विकास खुंटतो त्यामुळे सदर योजनेचा अधिकाधिक दिव्यांगांनी लाभ घ्यावा असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.
सर्व दिव्यांगांना घरबसल्या योजनेचा लाभ मिळावा याकरिता मनपाच्या www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा व अधिकाधिक दिव्यांग बांधवानी योजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.