नागपूर :- मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने शहरात सुरू असलेल्या नदी व नाले सफाई अभियानाने गती पकडली आहे. शहरातील प्रमुख तिनही नद्यांसोबतच नाल्यांची सफाई देखील सुरू असून नाले स्वच्छतेच्या कार्यातील गती आणि सातत्यामुळे लवकरच हे कार्य पूर्णत्वाकडे जाणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार नदी व नाले स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. दरवर्षी मनपातर्फे उन्हाळ्यात नदी व नाले स्वच्छता अभियान राबविण्यात येते. एप्रिल महिन्यापासूनच शहरातील विविध वस्त्यांमधून वाहणा-या नाल्यांच्या स्वच्छतेच्या कार्याला सुरूवात करण्यात आली. शहरात एकूण २२७ नाले असून यापैकी ११५ नाल्यांची स्वच्छता पूर्ण झाली आहे. मनुष्यबळ आणि मशीन अशा दोन्ही माध्यमातून शहरातील नाले स्वच्छ करून नागरिकांना पावसाळ्यापूर्वीच दिलासा मिळवून देण्याचा मनपाचा कटाक्ष आहे.
नाले स्वच्छता अभियान अंतर्गत नाल्यांची पूर्णपणे स्वच्छता करून पावसाळी पाणी वाहण्याकरीता सुरळीत प्रवाह करण्यात येत आहे. याद्वारे वाहणाऱ्या पाण्याची क्षमता वाढेल आणि वस्त्यांमध्ये पावसाळ्यात येणाऱ्या पूरापासून सुरक्षा प्रदान होईल. अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेन्द्र महल्ले यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, नागपूर शहरातील विविध भागातून वाहणा-या नाल्यांची संख्या एकूण २२७ आहे. यापैकी मनुष्यबळाद्वारे १५२ आणि मशीनद्वारे ७५ नाल्यांची स्वच्छता करण्यात येते. आतापर्यंत एकूण ११५ नाल्यांची स्वच्छता पूर्ण झालेली आहे. यातील ८५ नाल्यांची स्वच्छता मनुष्यबळाद्वारे तर ३० नाल्यांची स्वच्छता मशीनद्वारे करण्यात आली. २२ नाल्यांच्या स्वच्छतेचे कार्य प्रगतीपथावर आहे. २२ नाल्यांमधील १३ नाले मनुष्यबळाद्वारे व ९ नाले मशीनद्वारे स्वच्छ केली जात आहेत. ८८ नाल्यांची स्वच्छता अद्याप झालेली नसून त्यांच्या स्वच्छतेबाबत कार्यवाही पूर्ण झालेली आहे. लवकरच या नाल्यांची देखील स्वच्छता करून नाले स्वच्छता अभियान पूर्णत्वाकडे जाणार आहे. स्वच्छता झालेली नसलेल्या ८८ नाल्यांपैकी ५२ नाले मनुष्यबळाद्वारे आणि ३६ नाले मशीनद्वारे स्वच्छ केली जाणार आहेत.