![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
नागपूर :- गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात आणि पुरात अडकलेल्या नागपूरचे सिनियर डॉक्टर आणि ४ स्वामींचा बचाव करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ह्यांनी तातडीने मदत पोचवली. तत्काळ बचाव पथक पोचल्याने नागपूरकर काल मध्यरात्री सुखरूप सुरक्षित स्थळी पोचते झाले .
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
विवेका हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले नागपुरातील सुपरिचित न्युरोसर्जन डॉ. ध्रुव बत्रा ह्यांचे वडील ६७ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक आणि सिनियर डॉक्टर सुरेश बत्रा आणि त्यांच्यासोबत गेलेले रामकृष्ण आश्रमातील ४ स्वामी मध्यप्रदेशमधील खरगोन येथील रामकृष्ण आश्रमात थांबले होते. नर्मदेच्या परिक्रमेसाठी आलेल्या नागरिकांच्या उपचारार्थ सेवेसाठी ही मंडळी तिथे गेली होती. मध्य प्रदेशातील २० हून अधिक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीनंतर पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील प्रमुख नर्मदा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या बरगी धरणाचे सात दरवाजे शुक्रवारी उघडण्यात आले. दरम्यान, इंदूर, सिवनी आणि नर्मदापुरम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आजूबाजूच्या परिसरात पाणी भरायला सुरुवात झाली आणि मध्यप्रदेशमधील इतर गावांप्रमाणेच खरगोनसुद्धा बघता बघता पूरग्रस्त झाले. डॉ. बत्रा थांबलेल्या आश्रमात दोन मजली पाणी भरले असून ते वाढतच असल्याची सूचना त्यांच्या नागपूर निवासी मुलाला म्हणजे डॉ. ध्रुव बत्रा ह्यांना मिळाली. त्यांनी काळजीपोटी भराभर हालचाल केली. हवी तशी मदत कुठूनच मिळत नसल्याचे त्यांना लक्षात आल्यावर, अखेर त्यांनी नितीन गडकरी ह्यांच्या कार्यालयाकडे रात्री उशिरा मदतीसाठी धाव घेतली.
नागपूरकर खरगोनच्या पुरात अडकले असल्याची माहिती मिळताच नितीन गडकरी ह्यांनी ताबडतोब सूत्र हातात घेऊन चौकशी करण्यास सुरुवात केली. पाण्याची पातळी अत्यंत वाढली असल्याने ताबडतोब मदत पाठवणे कठीण होते. तरी नागपूरकरांच्या जीवाचा प्रश्न असल्याने त्यांनी सर्व शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले. अखेर काल मध्यरात्री नितीन गडकरी ह्यांनी प्रयत्नपूर्वक पाठवलेल्या बचाव पथकाच्या माध्यमातून सर्वांना सुरक्षित स्थळी पोचवण्यात आले.
नातेवाईकांचे सर्व प्रयत्न संपल्यावर, नितीन गडकरी ह्यांना केलेल्या एका विनंतीवरून, केवळ माहितीवरून केलेल्या तत्काळ मदतीमुळे नागपूरकरांना पुराच्या संकटातून बाहेर पडता आल्याने नातेवाईकांमध्ये समाधानाचे आणि कृतज्ञतेचे भाव आहे. ह्यासाठी डॉ. ध्रुव ह्यांनी सर्वांच्या वतीने नितीन गडकरी ह्यांचे आभार मानले.