पावसाळ्यात उद्भवणा-या आजारांपासून काळजी घ्या

दुषीत पाणी, उघड्यावरचे पदार्थ टाळा ; डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करा

नागपूर : लवकरच पावसाळ्याचे आगमन होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात उद्भवणा-या आजारांपासून सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी पावसाळ्यात पिण्याचे पाणी दुषीत नसल्याची खात्री करावी, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळावे व कुठलीही लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सर्व मनपा आणि शासकीय दवाखान्यांमध्ये उपचाराची सुविधा उपलब्ध असून नागरिकांनी आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात येत आहे.

पावसाळयामध्ये पिण्याचे पाणी काही कारणाने दुषीत झाल्यास कॉलरा, विषमज्वर, गॅस्ट्रो, हगवण अशा आजारांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव होतो. उघडयावरील खाद्यपदार्थांवर माशा बसून ते दुषीत झाल्यास उलट्या, जुलाब, कावीळ अशा प्रकारचे आजार होतात. सर्वसाधारणपणे पावसाळ्यामध्ये अशा आजाराचे प्रमाण वाढते, त्यामुळे म्हणून नागरीकांनी याबाबत आरोग्य दृष्टया काळजी घेणे आवश्यक आहे.

नागरीकांनी मनपाच्या माध्यमातून नळाद्वारे पुरवठा होणा-या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा. शुध्दीकरण न केलेल्या बोरवेल, विहीरीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करु नय. शिळे किंवा उघड्यावरचे माशा बसलेले अन्नपदार्थ खाऊ नये तसेच अन्न पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावेत. हातगाड्यांवर उघड्यावर विक्री होत असलेले खाद्यपदार्थ खाऊ नये. पिण्याचे पाणी उकळून थंड झाल्यावर शक्य असल्यास त्यामध्ये क्लोरीन गोळयांचा वापर करून ते पाणी पिण्याकरिता वापरावेत. प्रत्येक नागरीकांनी वैयक्तीक स्वच्छतेचे पालन करावे. उलटया, जुलाब, कावीळ, गॅस्ट्रो, टायफाइड झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरु करावेत. मनपाच्या आयसोलेशन दवाखान्यात गॅस्ट्रो रुग्णांवर मोफत उपचाराची सोय उपलब्ध आहे.

ताप, मळमळ, चक्कर, उल्टी, हगवण, इत्यादी गॅस्ट्रोची लक्षणे असून रुग्णाला त्वरित ओ. आर.एस. पाजावे व त्वरित डॉक्टरांकडे जाऊन उपचार करुन घ्यावा. नागरीकांनी आपल्या घरातील व सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. यासोबतच स्वाईन फ्लु ह्या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण शहरात आढळून आलेले आहेत. त्यादृष्टीने सर्व नागरीकांनी सर्दी, ताप किंवा फ्ल्यू सदृष्य लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दुखणे अंगावर काढू नये, स्वाईन फ्ल्यू किंवा एनफ्लुएन्झा करीता खात्रीशिर औषधोपचार उपलब्ध आहेत. नागरीकांनी सर्व सूचनांचे पालन केल्यास पावसाळयात उद्भवणा-या आजारावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. याकरिता नागरीकांनी मनपाला सहकार्य करावे असे आवाहन मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी केले आहे.

पावसाळ्यात उद्भवणा-या आजारांचे रुग्ण शहरातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे उपचारास आल्यास यांनी त्यांच्याकडे उपचारास आलेल्या अशा रुग्णांची माहिती मनपा आरोग्य विभागास त्वरित द्यावी, अशी सूचनाही मनपातर्फे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून कार्य करावे - प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी

Tue Jun 7 , 2022
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आयोजित ‘शिवस्वराज्य दिन’ उत्साहात   मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. त्यांनी लोकाभिमुख प्रशासनाचा संदेश देऊन कार्य केले आहे. लोकाभिमुख प्रशासनासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी सांगितले.             उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय आयोजित ‘शिवस्वराज्य दिन’ राज्य मध्यवर्ती ग्रंथालय नगर भवन, फोर्ट, मुंबईत झाला, त्यावेळी विकासचंद्र रस्तोगी बोलत होते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com