– भदंत ससाई यांच्या उपस्थितीत बुद्धवंदना
– बोधीवृक्षाच्या छायेत विसावले अनुयायी
– संविधान चौक, विमानतळ परिसरात अभिवादन
नागपूर :- स्मारक समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई उपस्थितीत काशाय वस्त्रातील भिक्खु आणि भिक्खुनी संघ सोमवारी सकाळी दीक्षाभूमीवर पोहोचला. यावेळी भदंत ससाई यांच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेतल्यानंतर बाबासाहेबांचा जयघोष करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमीला पवित्र दीक्षाभूमीवर महास्थवीर चंद्रमणी यांच्याकडून त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली. या दिवसाची आठवण म्हणून दर वर्षी ऑक्टोबरला दीक्षाभूमी येथे भदंत ससाई यांच्या प्रमूख उपस्थितीत बुध्दवंदना घेण्यात येते. यावेळी भदंत ससाई यांनी तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यानंतर स्तुपात त्रिशरण व पंचशील दिले. या प्रसंगी जापानच्या पंधरा श्रामनेरांसह भंते नागसेन, भंते प्रज्ञाबोधी, भंते भीमाबोधी, भंते माहानागा, धम्मप्रकाश, भंते अश्वजित, भंते नागवंश, भिक्खुनी संघप्रिया, बोधीप्रिया भिक्खु आणि भिक्खुनी संघ, अखिल भारतीय धम्मसेनेचे रवी मेंढे यांच्यासह उपासक उपासिका उपस्थित होते.
तत्पूर्वी इंदोरा बुद्ध विहार येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. इंदोरा चौक, संविधान चौक तसेच विमानतळ परिसरातील बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी शैलेश सवाईथुल, अशोक गोवर्धन, अतिश शेंडे, निलेश मेश्राम आदी उपस्थित होते.
पांढरे वस्त्र, निळी टोपी आणि पंचशील ध्वज
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा वर्धापन दिन सोहळा १२ ऑक्टोबरला उत्साहात पार पडला. यासोहळ्याला विविध राज्यातील आणि विदेशातील अनुयायी मोठया प्रमाणावर उपस्थित होते. स्थानिक बांधव गर्दी टाळण्यासाठी १४ ऑक्टोबरला पवित्र दीक्षाभूमीवर जातात. १४ ऑक्टोबरला स्थानिक उपासक उपासीकांनी सकाळपासून गर्दी केली होती. पांढरे वस्त्र, डोक्यावर निळी टोपी आणि हातात पंचशील ध्वज घेवून बाबासाहेबांचा जयघोष करत अबालवृध्द दीक्षाभूमीच्या दिशेने जात होते. शहरातील बांधव सहकुटुंब दीक्षाभूमीला पोहोचले. स्तुपाच्या आत जाण्यासाठी बरीच लांब रांग होती. अस्थीकलशाचे दर्शन घेतल्यानंतर अनेकांनी बोधीवृक्षाच्या छायेत बसून शांतीचा अनुभव घेतला. कडक उन असतानाही अनुयायांची गर्दी कमी नव्हती. सायंकाळी या गर्दीत पुन्हा वाढ झाली. अनुयायी येणार असल्याने दीक्षाभूमीच्या दुतर्फा मार्गावर बुद्ध, आंबेडकी साहित्याची दुकाने सजली होती. यासोबतच बुद्ध आणि बाबासाहेबांचे छायाचित्र आणि बुद्ध मूर्तीला प्रचंड मागणी होती. ठिकठिकाणी धम्मबांधवांसाठी भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्रीपर्यंत अनुयायांची गर्दी वाढत होती.