मुंबई :- समग्र शिक्षा योजनेतंर्गत ४,८६० शिक्षक पदांच्या भरतीसंदर्भात शासन निर्णय निर्गमित झाला आहे. यात दिव्यांग विशेष शिक्षकांच्या २१८ पदांचाही समावेश आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पदस्थापना येत्या दीड- दोन महिन्यात करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
विधानपरिषद सदस्य ॲड.निरंजन डावखरे, किरण सरनाईक यांनी राज्यातील दिव्यांग शिक्षक कर्माच्यांच्या समायोजना संदर्भात प्रश्न विचारला होता.
शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले की, या भरती प्रक्रियेसाठी शिक्षण संचालक यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाद्वारे उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि छाननी केली जाईल. त्यानंतर येत्या दीड महिन्याच्या आत सर्व पात्र उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या विशेष शाळा दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून कार्यरत असून, त्यासाठी अधिक पदे उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित विभागाला पाठवण्यात आल्या आहेत. भविष्यात यासंदर्भात एक समिती नेमली जाणार असून, त्याच्या शिफारशीनुसार पुढील निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी संगितले.