संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
नागपूर :- प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियांनांतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी श्रीमती सुग्रता वंजारी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वडोदा ता. कामठी जी. नागपूर येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात आले असून दि. 20 सप्टेंबर ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास एक हजार महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात आले आहे. यासाठी वंजारी महाविद्यालयाद्वारे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूरशी करार करण्यात आलेला असून कामठी तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधीष्टीत अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सदर कौशल्य केंद्रित अभ्यासक्रमांना मोफत प्रवेश देण्यात येत असून याचा लाभ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच कामठी तालुक्यातील अनेक होतकरू मुला-मुलींना मिळणार आहे.
ग्रामीण भागात राहणा-या विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांसारखे मुख्य प्रवाहामध्ये आणणे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात आले. रोजगारभिमुख कौशल्ये नसल्यामुळे पारंपारिक पदवी-शिक्षण पूर्ण करूनही ग्रामीण विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नाही. शिवाय रोजगारभिमुख कौशल्ये आत्मसात करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक सुविधा व कौशल्याधीष्टीत अभ्यासक्रम उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामीण भागात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून ग्रामीण भागातील मुला-मुलीना नोकरीच्या संधीपासून दूर राहावे लागत आहे.
रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक व रोजगाराभिमुख शिक्षण देणे गरजेचे असून अशाप्रकारच्या मोफत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे हे शैक्षणिक संस्थांचे नैतिक कर्तव्य आहे. सदर जाणीव लक्षात घेऊन श्रीमती सुग्रता वंजारी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाद्वारे वडोदा येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू केलेले आहे. या अंतर्गत Fashion Designing, Sales Executive, Social Media Influencer, Beauty Parlour यासारखे व्यवसाय व रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम महाविद्यालयामध्ये सुरु करण्यात आलेले आहे. सदर अभ्यासक्रमांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतलेला असून भविष्यात अशाप्रकारचे अनेक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे सर्व अभ्यासक्रम मोफत असून या सुवर्ण संधीचा ग्रामीण भागातील मुला-मुलींनी लाभ घ्यावा असे आवाहन माहाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. गामा सेलोकार आणि डॉ. ओमप्रकाश नाल्हे यांनी केले.