शेतक-यांच्या समस्या सोडविण्यासाठी डॉ. भाऊसाहेबांनी आपले आयुष्य खर्ची घातले प्रसिध्द व्याख्याते डॉ. सुधीर भोंगाळे यांचे प्रतिपादन

अमरावती :- शेती हाच डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा जीव की प्राण होता आणि त्यांनी आपले सर्व आयुष्य शेतक-यांच्या समस्या सोडविण्यासाठी खर्ची घातले, असे प्रतिपादन प्रसिध्द व्याख्याते व पुणे येथील कृषीतज्ज्ञ डॉ. सुधीर भोंगाळे यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ‘डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख व भारतीय कृषी क्षेत्र’ या विषयावर सोमवारी 10 एप्रिल, 2023 रोजी डॉ. के.जी. देशमुख सभागृह येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. विजय नागरे, डॉ. हरिदास धुर्वे, अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड उपस्थित होते.

डॉ. सुधीर भोंगाळे पुढे बोलतांना म्हणाले, डॉ. भाऊसाहेब यांनी वेगवेगळ्या देशात जावून तेथील शेतीचा अभ्यास केला व भारतातही शेती उत्पादनवाढीसाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न केले. कृषी विद्यापीठ अमरावतीत व्हावे, अशी डॉ. भाऊसाहेबांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न देखील केले. जपानमधील भातशेतीचाही त्यांनी अभ्यास केला होता. तर नार्वे देशातील मासे उत्पादनाचा त्यांनी अभ्यास करुन भारतात मासे उत्पादन कसे वाढविता येईल, जेणेकरुन शेतकरी आणखी कसे सुखी होतील यासाठी त्यांनी प्रयत्न केले. 1956 मध्ये त्यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली. दिल्ली येथे 1960 मध्ये 82 दिवसांचे जागतिक कृषी प्रदर्शनही भरविले व वेगवेगळ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष या परिषदेला उपस्थित होते. क्रांतीसूर्य महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर त्यांची नितांत श्रध्दा होती व त्यांच्या विचारसरणीवर ते चालत राहिले.

याप्रसंगी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. हरिदास धुर्वे, प्राचार्य डॉ. विजय नागरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात कुलसचिव डॉ. तुषार देशमुख म्हणाले, महापुरुषांचा आदर्श घेऊन त्यांचे विचारकार्याचे आपण आपल्या जीवनात आचरण करावे, जे जे शक्य आहे ते निश्चितच केले पाहिजे, जेणेकरुन आपला आदर्श आपली मुले, विद्यार्थी घेतील. प्रास्ताविक डॉ. संतोष बनसोड, संचालन अभिजित इंगळे यांनी, तर आभार भाग्यश्री गाडगीळ हिने मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

...अन् डॉ. के.जी. देशमुख सभागृह स्तब्ध अपूर्वा सोनार यांनी साकारली ‘मी सावित्री बोलतेय’

Tue Apr 11 , 2023
अमरावती – ‘मी सावित्री बोलतेय’ हा एकपात्री नाटयप्रयोग सोमवार दि. 10 एप्रिल, 2023 रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या डॉ. के.जी. देशमुख सभागृहात संपन्न झाला. अपूर्वा सोनार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मापासून तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूपर्यंतची सावित्रीबाई फुले अगदी हुबेहुब साकारली आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यू आणि अंत्यसंस्काराचा प्रसंग साकारतांना अख्ख डॉ. के.जी. देशमुख सभागृह स्तब्ध झालं […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com