मुंबई :- राज्यात गेल्या आठवडाभरापासून तापमानाने उच्चांकी पातळी गाठली आहे. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यातच राज्यातील अनेक शहरांचे तापमान चाळीस अंशाच्या वर गेले आहे. काही शहरांनी तापमानाची 45 ओलांडली आहे. यामुळे या शहरांमध्ये अघोषित संचारबंदी दिसून येत आहे. राज्यात जळगाव आणि अकोला शहरे सर्वाधिक हॉट शहरे ठरली आहे. या शहरांचे तापमान अनुक्रमे 45.3 आणि 45.5 अंश सेल्सियस होते.
अकोल्यात उच्चांकी तापमानाची नोंद
विदर्भात अकोला सर्वाधिक हॉट शहर ठरले आहे. अकोलाचा पारा 45.5 अंशांवर पोहोचला आहे. यंदाचा उन्हाळ्यातील अकोल्यात गुरुवारी उच्चांक तापमानाची नोंद झाली. तर यवतमाळ 43.05, अमरावती 43.2, चंद्रपूर 43.2, वर्धा 43.02 आणि नागपुरात 41.9 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. पुढील काही दिवसासाठी पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
अकोला, जळगाव ठरते हॉट सिटी
अकोला आणि जळगाव शहर हॉट सिटी म्हणून ओळखले जाते. हॉट सिटीमध्ये दुपारी शहरातील रस्ते सामसूम पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने अजून तीन दिवस तापमान वाढलेले असणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असा सल्ला दिला आहे. कामानिमित्त घराबाहेर पडत असाल तर डोक्यावर टोपी, रुमाल, गॉगल आणि पाण्याची बॉटल घेऊनच घराबाहेर पडण्याचा सल्ला जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
अनेक शहरांचे तापमान 40 अशांच्या वर
धुळे, अहमदनगर, नाशिक, मालेगाव, उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, बीड, अमरावती, बुलढाणा, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, यवतमाळ या शहरांचे तापमान 40 अशांच्या वर गेले आहे. वाढलेल्या तापमानामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे, मुंबईमध्ये उन्हाचा फटका नागरिकांना बसत आहे. मुंबईत पारा प्रचंड वाढला असून आरसिटी मॉलमध्ये तापमानात स्नोचा अनुभव घेण्यासाठी गर्दी होत आहे.