धानउत्पादक शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या – मुख्यमंत्री
नागपूर :- धान उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली प्रोत्साहन राशी (बोनस) नियत कालावधीत वितरीत करण्यात यावी या लाभापासून कोणीही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आनंदाचा शिधा योजनेसह विविध लोककल्याणकारी योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधतांना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी तसेच धान उत्पादक शेतकरी व लाभार्थ्यांशी दूरदृश्यप्रणालीव्दारे थेट संवाद साधला.त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभार्थ्यांशी जिल्हाधिकारी कार्यालयातील दूरदृश्यप्रणालीव्दारे संवाद साधला. यावेळी जिल्ह्यातील विविध योजनांचे 60 लाभार्थी उपस्थित होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, अन्न धान्य वितरण अधिकारी भास्कर तायडे, पुरवठा विभागाचे उपायुक्त रमेश आडे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी मुदृला मोरे यांची उपस्थिती होती.
राज्य शासनाने सण व उत्सवासाठी आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला असून त्याअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील सुमारे 4 लाख 13 हजार 667 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजने अंतर्गत बहुतांश लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.शिवभोजन थाळी योजने अंतर्गत जिल्ह्यात 44 केंद्रावरून योजना राबविण्यात येत आहे.धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर बोनस जाहिर करण्यात आला असून त्या अंतर्गत 10 हजार 200 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आल्या आहे.
लाभार्थ्यांच्या प्रातिनिधीक प्रतिक्रिया
आनंद देणारा आनंदाचा शिधा
नागपूर शहरातील वाडी येथे राहणाऱ्या पुष्पा शिंदे यांना आनंदाचा शिधा या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यांनी या योजनेचा लाभ मिळत असल्यामुळे आनंद व्यक्त केला. मागील तीन वर्षापासून मला शिधा मिळत असल्याने कुटुंबाचे पालन पोषण करणे सुलभ झाले असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
आनंदाचा शिधा गोरगरीबांसाठी लाभाचा
शहरातील इंदोरा चौक (टेका नाका) येथे राहणारे प्रशांत अंबादे हे ई – रिक्शा चालक आहेत. मला आनंदाचा शिधा या योजनेचा लाभ मिळाला आहे. आनंदाचा शिधा मिळाल्यामुळे कुटुंबासोबत सण साजरा करणे मला शक्य झाले आहे.या योजनेचा लाभ दिल्यामुळे मी शासनाचा आभारी आहे .