![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
– 29 सप्टेंबर ‘शौर्य दिन’ साजरा
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
नागपूर :- अतिरेक्यांच्या हल्ल्यांना आपण फक्त प्रतिकार करण्याचे काम करीत असतो. पाकिस्तानी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये भारतीय 18 सैनिक मारले गेले. ही दुदैवी घटना घडली होती. त्यांच्या दुष्कृत्याला धाडसाने दिलेल उत्तर म्हणजे ‘सर्जिकल स्ट्राईक’ होय, असे मेजर जनरल अच्चुत देव यांनी स्पष्ट केले. शौर्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. त्यामुळे 29 सप्टेंबर हा दिवस भारतवासीयांसाठी अभिमानाचा दिवस असून भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यत जावी तसेच हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या वीरपत्नी/वीरमाता तसेच शौर्य पुरस्कार विजेत्या वीरांचा सत्कार व्हावा या भावनेतून राज्य शासनामार्फत हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नागपूर यांच्यामार्फत वसंतराव देशपांडे सभागृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, मेजर जनरल अनिल बाम, व्हॅाइस अडमिरल किशोर ठाकरे, ब्रिगेडिअर सुहास कुलकर्णी, मेजर जनरल अजित गद्रे, ब्रिगेडिअर सुनिल गावपांडे, ब्रिगेडिअर एम.खानजोडे, मेजर जनरल ग्लेन फोर्ड, कमांडर उदय चिटणवीस, कमांडर राजीव भडंग यावेळी उपस्थित होते.
देशाचे स्वातंत्र, सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी परकीय शक्तीपासून देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी, आपत्ती काळात देशबांधवांच्या मदतीसाठी सज्ज असणारे, कोणत्याही अडचणीत आपली कर्तव्ये चोखपणे बजावणारे भारतीय सैनिक हे आपल्या सर्वांसाठी आदर आणि अभिमान आहेत. भारतीय सैनिकांचे काम हे निश्चितच गौरवाचे, कर्तृत्वाचे आणि अभिमानाचे असल्याचे ते पुढे म्हणाले.
शहीद वीर जवानांच्या वीरपत्नी, वीरमातांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच सैनिकांच्या समस्यांचे निराकरणासाठी मंडळाचे गठन करण्यात आल्याचा उल्लेखही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर शिल्पा खरपकर यांनी या कार्यक्रमात केला.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर शिल्पा खरपकर यांनी प्रास्ताविकेतून कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती दिली. या कार्यकमाला अनेक शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी करण्यात आले होते. सैन्य दलातील अधिकाऱ्यांसोबत परिचय व्हावा तसेच त्यांच्या कार्याची माहिती मिळावी यासाठी त्यांना सहभागी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सत्येंद्रकुमार चौरे यांनी केले.
कार्यक्रमाला वीरपत्नी, वीरमाता, माजी सैनिक तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.