– असामाजिक तत्वाविरूद्ध रेल्वेची विशेष मोहीम
– नागपूर, कळमना, कामठी परीसरात खोडसरपणा
– पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद
नागपूर :- अत्याधुनिक आणि स्वदेशी वंदे भारत एक्सप्रेसह इतरही रेल्वे गाड्यांवर दगडफेक केली जाते. अलिकडेच अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. असामाजिकतत्वांकडून असा खोडसर पणा केला जात आहे. मात्र, त्यांच्या आनंदात दुसर्यांचा जीव धोक्यात येतो. शिवाय रेल्वे संपत्तीचेही नुकसान होत आहे. दगडफेकीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने कंबर कसली असून विशेष मोहिम राबवित आहे.
नागपुरातून सुटणार्या आणि कोलकाता मार्गाने जाणार्या गाड्यांवर रूळाशेजारी असलेली मुले गाड्यांवर दगडफेक करतात. यात वंदे भारत एक्सप्रेस, गीतांजली एक्सप्रेस, अहमदाबाद एक्सप्रेस आणि मालगाड्यांचा समावेश आहे. आतापर्यंत 18 वेळा दगफेक करण्यात आली आहे. या घटनेत काही प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी जखमी सुध्दा झालेत. या घटनेची गंभीर दखल घेत दपूम रेल्वेचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त पंकज चुघ यांनी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार दपूमरेचे पथक तयार करण्यात आले असून असामाजिकतत्वांची धरपकड सुरू आहे.
नागपुरातून गाडी सुटल्यानंतर आउटवर, कळमना, कामठी तसेच गोंदीया पर्यंतच्या मार्गावर दगडफेक केली जाते. दगडफेक होणार्या ठिकाण चिन्हांकीत केले असून आरपीएफचे पथक त्या ठिकाणी जावून दगडफेक करणार्या असामाजिकतत्वांची धरपकड करीत कायदेशीर कारवाई केली जात आहे. दगडफेक करणे, रेल्वे संपत्तीचे नुकसान करणे या प्रकरणात गुन्हा सिध्द झाल्यास पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
दगडफेक करणार्या 18 जनांवर कारवाई
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. त्यामुळे दगफेक कुठे आणि कोणी केली याचा तपास करुन 18 जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच यासर्वांना रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले. दगडफेक करणार्यांची माहिती त्वरीत आरपीएफला द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
@ फाईल फोटो