– आयुर्वेद महाविद्यालयातील चर्चासत्राचे उद्घाटन
नागपूर :- अशक्य वाटणारी गोष्टही संशोधनातून शक्य आहे. पण या संशोधनाला व्यावहारिकतेची आणि वास्तविकतेची जोड दिली तर त्याची लोकप्रियता वाढविणे अधिक सहज होते, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी (आज) केले. हनुमान नगर येथील श्री आयुर्वेद महाविद्यालयात आयोजित चर्चासत्राचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
बदलत्या जीवनशैलीत श्रीधान्याची (भरडधान्य) भूमिका या विषयावर पं. राम नारायण शर्मा स्मृती राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला बैद्यनाथचे प्रमुख सुरेश शर्मा, गोविंदप्रसाद उपाध्याय, बनवारीलाल गौड, प्राचार्य डॉ. ब्रिजेश मिश्रा, डॉ. वेदप्रकाश शर्मा, संजय जोशी, पुखराज बंग, रामेश्वर पांडे, रामकृष्ण छांगानी, संतोष शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. गडकरी म्हणाले, ‘भरडधान्यांचे आरोग्यासाठी खूप महत्त्व आहे. त्यादृष्टीने अनेक संशोधने झाली. काही संशोधनांमध्ये यश आले, काहींमध्ये अपयश आले. पण माझ्या दृष्टीने भरडधान्याचा वापर अधिक प्रमाणात करता येईल का, याचेही संशोधन होणे गरजेचे आहे. कुठलेही ज्ञान वास्तविकतेत उपयोगी पडत असेल तर त्याचे महत्त्व अबाधित राहत असते. भरडधान्यांपासून तयार होणारे पदार्थ अधिक चवदार आणि आकर्षक होऊ शकतात का, याचा विचार करायला हवा. या पदार्थांकडे सर्वसामान्य माणूस आकर्षित होईल यादृष्टीने त्यांचे फॉर्म्युलेशन असायला हवे.’ भरडधान्यांपासून तयार झालेल्या चवदार पदार्थांचे पॅकेजिंग, मार्केटिंग या बाबींचाही विचार व्हायला हवा, असेही ना. गडकरी म्हणाले. यावेळी त्यांच्या हस्ते एका स्मरणिकेचे प्रकाशनही झाले.