![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
नागपूर :- आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षानिमित्त ग्रामायण प्रतिष्ठान, नागपूरच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी मिलेट आहार प्रश्न मंजुषा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 11 शाळांतील दीड हजार विद्यार्थांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत उत्कृष्ट ठरलेल्या तीन विद्यार्थाना आज दुसऱ्या दिवशी २३ डिसेंबर रोजी ग्रामायण प्रदर्शनात बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सिंधी हिंदी हायस्कूल मुख्याध्यापिका लक्ष्मी मोझरकर यांच्या हस्ते बक्षीस मित्राचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सांबरे उपस्थित होते.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त मिलेट आहार प्रश्न मंजुषा ही स्पर्धा घेतांना सर्वच शाळांकडून छान प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा मुख्य उद्देश मुलांपर्यंत मिलेटचे महत्व, त्यात असलेले जीवनसत्व व त्यापासून वेगवेगळ्या पाककृती होवू शकतात हे पोहचावे हा होता. स्पर्धा दोन फेऱ्यामध्ये आयोजित करण्यात आली. एकुण ११ शाळांनी सहभाग नोंदवला. प्रश्न मंजुषा 2 भागात घेण्यात आली. पहिल्या फेरीमध्ये २० प्रश्न असलेली पर्यायवाचक प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्यातुन १०० विद्यार्थी निवडण्यात आले. दुसऱ्या फेरीत निवडलेल्या १०० मुलांसाठी ऑनलाईन मल्टिल्पल चॉईस परीक्षा घेण्यात आली. त्यातील विद्यार्थी बक्षिसपात्र तीन विद्यार्थी निवडण्यात आले. या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे दीड हजार रुपयाचे रोख बक्षीस सोमलवार हायस्कूल रामदासपेठची विद्यार्थिनी अक्षता निलेश तराजकर हिला देण्यात आले. द्वितीय क्रमांकाचे प्रत्येकी एक हजार रुपयांचे बक्षीस अनुक्रमे सोमलवार हायस्कूलचा विद्यार्थी शंतनु सुशांत बाबरे आणि टीबीआरए मुंडले स्कूल लक्ष्मीनगरची विद्यार्थिनी वेदांती मनोज तिजोडी यांना देण्यात आले. यावेळी सर्व १०० विद्यार्थी, शिक्षक आणि प्राचार्यांना प्रत्येकी १०० रुपयाचे फुड कुपन देण्यात आले. प्रत्येक शाळेला सहभाग स्मृतीचिन्ह देण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुण्या सिंधी हिंदी हायस्कूल मुख्याध्यापिका लक्ष्मी मोझरकर यांनी विद्यार्थ्यांना मिलेटचे आरोग्यदायी फायदे सांगत विद्यार्थ्यांना मिलेटचे सेवन नियमित करण्याचे आवाहन केले. जुन्या पिढीने आहार चांगला ठेवला त्यामुळे निरोगी जीवन जगत आहेत. पिझ्झा बार्कर खाणारे देश आज बाजरी, ज्वारी खाऊ लागले आहेत. त्यामुळे आज आपण देखील पाश्च्यात देशातील खाद्य संस्कृती स्वीकारण्यापेक्षा आपली ग्रामीण कडधान्य पुन्हा अंगिकारले पाहिजे असे आवाहन केले.
यावेळी ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सांबरे म्हणाले, पालकांनी मिलेटचे पदार्थ करून घरी करून पाहिजे. यापुढेही केवळ आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षानिमित्तच नव्हे, तर नेहमी आपल्या आहारात मिलेटचे पदार्थ समाविष्ट करावेत. मिलेट हे आरोग्यदायी अन्नधान्य आहे. ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सामाजिक जाणीव विकसित होण्यासाठी आपला असा सहभाग समाजामध्ये, गटामध्ये, वर्गामध्ये आवश्यक आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिलेटचे महत्त्व आणि आरोग्यदायी फायदे याबद्दल माहिती देण्यात आली. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये मिलेट आहाराबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कार्यक्रम प्रास्ताविक व संचालन माधुरी केळापुरे यांनी केले, तर आभार जयश्री आलकारी यांनी मानले.