नागपूर :- गेल्या दहा वर्षात दोनवेळा देशातील जनतेशी खोटं बोलून त्यांची दिशाभूल करुन भाजपचं सरकार आलं. मात्र त्यांनी दिलेली कुठलीही आश्वासने पूर्ण झाली नाहीत. याचा जाब विचारण्यासाठीही भाजपच्या हायप्रोफाईल नेत्यांपर्यंत सामान्य नागरिकांना पोहोचता येत नाही. दुसरीकडे काँग्रेसने दिलेली आश्वासने पूर्ण केलीत. याचा ताजं उदाहरण तेलंगणा आहे. तसेच आम्ही कुठे चुकले तर आम्हाला जाब विचारण्याचा पूर्ण हक्क जनतेला आहे. त्यामुळे तुम्हाला हायप्रोफाईल जुमलेबाजांची सरकार हवे की सामान्य जनतेच्या हक्काचे हे तुम्ही ठरवा असा घणाघात इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांनी भाजपवर केला. गोरेवाडा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.पुढे ठाकरे म्हणाले, “देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरु असून संविधान बदल करण्याची भाषा भाजपचे ज्येष्ठ नेते करत आहे. त्यामुळे सध्या सर्वांनी एकत्र येऊन लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी लढा देण्याची गरज निर्माण झाली आहे. विदेशात असलेला काळा पैसा देशात आणणार, प्रत्येकाच्या खात्यात पंधऱा लाख रुपये देणार, महागाई कमी करणार अशी असंख्य खोटी आश्वासने भाजपने दिली होती. त्याचे पुढे काय झाले हे सर्वांना समजले आहे. त्यामुळे जनता यंदा भाजपला घरी बसविल्याशिवाय राहणार नाही.”
शनिवारी जन आशीर्वाद यात्रेनंतर सायंकाळी पश्चिम नागपुरात गोरेवाडा जूनी वस्ती, उत्तर नागपुरात कांजी हाऊस चौक, टेका येथील नवीन वस्ती, मध्य नागपुरातील मोमीनपुरा, दक्षिण नागपुरातील शिवनगर अशा चार सभांचे आयोजन करण्यात आले होते. प्रामुख्याने माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री डॉ. सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री अनिस अहमद, आमदार अभिजीत वंजारी यांची उपस्थिती होती.