नागपूर :- नागपूर शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी मनपासह वाहतूक पोलिस, केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नीरी या सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावे, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मनपा द्वारे राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांचा शुक्रवारी (ता.१६) मनपा आयुक्तांनी आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात झालेल्या आढावा बैठकीत मनपाचे उपायुक्त रवींद्र भेलावे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) जयेश भांडारकर, मनपा परिवहन प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, ‘नीरी’च्या प्रिसिंपल सायंटिस्ट संगीता गोयल, कार्यकारी अभियंता अल्पना पाटने, सार्वजनिक आरोग्य अभियंता संदीप लोखंडे, प्रकल्प अधिकारी राऊत, गभने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे राजेंद्र पाटील, सल्लागार डॉ. गीतांजली, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सल्लागार डॉ. संदीप नारनवरे आदी उपस्थित होते.
वायू गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे विविध कामांचे कार्यादेश प्रदान करण्यात आलेले आहेत. यापैकी बहुतांश कामे पूर्णत्वास आलेली आहेत तर काही प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. यामध्ये मनपाच्या परिवहन सेवेमध्ये विद्युत बसेसचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. मनपाद्वारे १४४ नवीन ई-बसेससाठी कार्यादेश देण्यात आला असून, ६० ई-बसेस सध्या सेवेत आहेत. वाडी, हिंगणा आणि लकडगंज येथील चार्जिंग स्टेशन आणि बस डेपोचे काम देखील पूर्ण झाले असून वाठोडा बस डेपोचे काम सुरू असल्याची माहिती आयुक्तांपुढे सादर करण्यात आली. शहरात हरीत क्षेत्राच्या विकासासाठी उद्यान विभागाद्वारे विविध कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. यातील भारत माता उद्यानामध्ये हरीत क्षेत्र विकसित करण्यात आलेले आहे. याशिवाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करण्यात आलेले आहे.
रस्त्यांवरील खड्डे बुजवून त्याचे समतलीकरण आणि पर्यावरणपूरक दहन घाटांच्या विकासासाठी कार्यादेश प्रदान करण्यात आलेले आहेत. याशिवाय सर्वाधिक प्रदूषणाची नोंद असलेल्या व नागरी वस्तीनिहाय गंगाबाई घाट, मोक्षधाम घाट आणि मानेवाडा या दहन घाटांवर वायू प्रदूषण नियंत्रण प्रणाली लावण्याचे कामाचे निविदा प्रकाशित करण्यात आली आहे. जयताळा, चिंचभुवन आणि फ्रेन्ड्स कॉलनी येथील दहनघाट विकसीत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे,
वायू गुणवत्ता सुधारणा आणि बळकटीकरणासाठी नागपूर महानगरपालिकेने सीएसआयआर-नीरी चे सहकार्य घेतले आहे. वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपा, वाहतूक पोलिस, नीरी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या समितीचा आढावा घेण्याची सूचना यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली.