Ø यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा पुस्तिकेचे प्रकाशन
नागपूर :- आत्मनिर्भर भारत मोहिमेतंर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमध्ये (पीएमएफएमई) नागपूर विभागात 1 हजार 411 लाभार्थ्यांना उद्योग सुरु करण्यासोबतच उद्योगांच्या विस्तारासाठी कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. राज्यात वैयक्तिक लाभार्थी घटकांतर्गत सर्वाधिक प्रकरणे नागपूर विभागात मंजूर झाल्याची माहिती, कृषी प्रक्रिया व नियोजन संचालक सुभाष नागरे यांनी दिली.
वनामती येथील सभागृहात नागपूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातर्फे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गंत आयोजित कार्यशाळेत ‘पीएमएफएमईअंतर्गत उद्योजकांच्या यशोगाथा’ पुस्तिकेचे प्रकाशन नागरे यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यशाळेत नागपूर विभागातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आत्माचे प्रकल्प संचालक, प्रकल्प उपसंचालक, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, जिल्हा संसाधन व्यक्ती सहभागी झाले होते.
राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबविण्यात येत असून याअंतर्गत पारंपरिक तसेच स्थानिक उत्पादनांना कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. विभागात या योजनेंतर्गंत सुरु केलेल्या यशस्वी उद्योजकांच्या यशकथा संकलीत करण्यात आल्या असून त्यापैकी प्रातिनिधीक स्वरुपातील निवडक यशोगाथांचे पुस्तक तयार करण्यात आले आहे. विभागात 1 हजार 411 प्रकरणे मंजूर करण्यात आली असून यामध्ये नागपूर जिल्ह्यात 309, वर्धा जिल्ह्यात 282, भंडारा जिल्ह्यात 169, चंद्रपूर जिल्ह्यात 297, गोंदिया जिल्ह्यात 205 तर गडचिरोली जिल्ह्यात 149 प्रकरणांचा समावेश आहे. हे पुस्तक ग्रामीण भागातील उद्योजकांना मार्गदर्शक ठरणारे असल्याचे नागरे यांनी सांगितले.
प्रारंभी नागपूर विभागाचे कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे यांनी पीएमएफएमई योजनेमध्ये नागपूर विभागात सर्वाधिक उद्योग सुरु झाले असून ग्रामीण भागातील उत्पादित कृषी मालावर प्रक्रिया करुन बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ही योजना महत्वाची ठरली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध वित्तीय संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
विभागात वैयक्तिक लाभार्थी घटकांतर्गत उत्कृष्ट उद्योग उभारणी केलेल्या तालुका कृषी अधिकारी जिल्हा संसाधन व्यक्ती अग्रणी बँक व्यवस्थापक यांना प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यशाळेचे सूत्रसंचलन अधिक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे यांनी तर आभार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे यांनी मानले. कार्यशाळेत तज्ञ मार्गदर्शक सत्यवान वराडे, अमोल चिद्रावार, चंद्रकांत भोर, दिनेश राठोड, विलास बोभाटे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या लाभासाठी तसेच तांत्रिक बाबींविषयी मार्गदर्शन केले.