![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
– भाजपकडे भ्रष्टाचाराचे आरोप स्वच्छ करणारी मोठी “लाँड्री”: मल्लिकार्जून खरगे यांचा घणाघात
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
– विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला उदंड प्रतिसाद
नागपूर :- भाजपकडून विरोधीपक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येतात. नंतर मोदी ते भ्रष्टाचाऱ्यांना भाजपमध्ये आणतात, मग अमित शाह त्यांना वॉशिंगमशीनमध्ये टाकतात आणि नितीन गडकरी त्या भ्रष्टाचाऱ्यांना बाहेर काढतात. यांच्या लॉन्ड्रीमधून निघालेला भ्रष्टाचाराचे आरोप असलेला नेता हा पूर्णपणे स्वच्छ होतो. अशाच प्रकारे २३ मोठ्या नेत्यांना याच मोठ्या लाँड्रीमधून स्वच्छ केले असून आता त्या नेत्यांवर कुठलेही आरोप नाही, ना त्यांची चौकशी सुरु आहे. हा भाजपचा दुट्प्पीपणा सर्वांना कळला असून आता संधी दिली जाणार नसल्याचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले. रविवारी गोळीबार चौक येथे इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. विकास ठाकरे हे “हायफाय” नसून काँग्रेसचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. देशात सुरु असलेली ही लढाई मोदी किंवा गडकरी यांच्याशी नसून ही मनुवादी विचारधारेविरुद्धची लढाई आहे. या मनुवादी विचारधारे विरुद्ध लढणाऱ्या विकास ठाकरे नागपूर लोकसभा जिंकत असल्याचा विश्वासही यावेळी खर्गे यांनी व्यक्त केला.
प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, माजी मंत्री डॉ. सतिश चतुर्वेदी, माजी मंत्री अनिस अहमद, अतुल कोटेचा, अतुल लोंढे, बंटी शेळके, राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांची उपस्थिती होती.
पुढे खर्गे म्हणाले की, “दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार, महागाई कमी करणार, विदेशातील काळा पैसा देशात परत आणून प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये देणार अशी खोटी आश्वासने देऊन भाजप सत्तेवर आली. मात्र परत नवीन गॅरंटी घेऊन पुन्हा लोकांना मत मागत आहे. मात्र सर्व सामान्य नागरिक आता भाजपला सवाल विचारायला लागला आहे. त्यामुळे यंदा भाजपला घरी बसवणार आहे.”
पुढे खर्गे म्हणाले की, “आम्ही राम मंदिर बनवले म्हणून मत द्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे आम्ही काटेकोरपणे पालन करतोय असे सांगून भाजप मत मागत आहे. मात्र संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटोही कधी भाजपच्या कार्यालयात दिसले नाही. या उलट देशाचा राष्ट्र ध्वजही संघ मुख्यालयावर ५२ वर्षे फडकावला नाही.”
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विकास ठाकरे म्हणाले की, “ही फक्त लोकसभेची लढाई नसून लोकतंत्र वाचविण्याची लढाई आहे. मागील दहा वर्षांपासून लोकतंत्राला धक्का लागला असून हुकुमशाही पद्धतीने हे केंद्रसरकारचे कारभार सुरु आहे. विरोधी पक्ष संपवायचा आणि लोकशाही संपवायचा कार्यक्रम सत्ताधारी भाजपने चालवले आहे. केंद्रात नरेंद्र मोदी करत आहे, तेच नागपुरात गडकरी करत आहेत. माझ्याविरोधात लढायला उमेदवारच नसल्याचे गडकरी म्हणाले होते. मी जनतेजवळ मत मागायला जाणार नाही. प्रचार करणार नाही. चहा पाजणार नाही असे बोलले होते. सामान्य माणसाला नेता बनविण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिला आहे. मत मागणार नाही म्हणणारे आता गल्लोगल्ली फिरत असून त्यांच्या प्रचारासाठी दोन-दोन मुख्यमंत्री बोलवावे लागत आहे. ही लढाई नागपूरची जनता जिंकली आहे.”