मुंबई :- कर्नाटकातील निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्नाटकातील लोकांनी फोडाफोडीचं राजकारणाला धडा शिकवला आहे. तसेच धार्मिक आणि जातीय राजकारणाला थारा दिलेला नाही. काँग्रेसच्या हाती जनतेने सत्ता दिली आहे. येत्या 2024च्या लोकसभा निवडणुकीतही हाच कल दिसून येण्याची शक्यता आहे, असं शरद पवार म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीने केवळ कर्नाटकात एन्ट्री करण्यासाठी निवडणूक लढवली होती, असंही स्पष्ट केलं.
राष्ट्रवादी कर्नाटकात शक्तीशाली पक्ष नाही. आम्ही सात उमेदवार उभे केले. त्यातील एकाच उमेदवाराला आम्ही शक्ती दिली होती. तिथे रिझल्ट येईल असं वाटत होतं. निपाणीत आमचा उमेदवार दुसरा क्रमांकावर आहे. तिथे यश मिळेल असं वाटत नाही. कारण सहा हजाराचं अंतर आहे. पण एखाद्या राज्यात एन्ट्री करायची असेल तर त्यासाठी निवडणूक लढवायची होती. ते आम्ही केलं, असं शरद पवार यांनी सांगितलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
लोकसभेची नांदी
केरळमध्ये भाजपचं सरकार नाही, कर्नाटकात नाही. तेलंगनात नाही. आंध्रात नाही. राजस्थानात नाही. दिल्लीत नाही, झारखंडमध्ये नाही. पंजाबमध्ये नाही. पश्चिम बंगालमध्येही नाही आणि बिहारमध्ये नाही. बहुसंख्य राज्यात भाजप सत्तेच्या बाहेर जाणारा आहे. 2024मध्ये ज्या निवडणुका होतील. त्यात काय अंदाज असेल हे या निकालातून स्पष्ट होत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.